अहमदनगर स्थानकची जंक्शनच्या दिशेने वाटचाल -हरजीतसिंह वधवा

जिल्ह्यात मध्य रेल्वे अंतर्गत रेल्वे लाईन दुहेरी करण्याकरिता 500 कोटी जाहीर करण्यात आले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या 2022-23 च्या बजेटमध्ये रेल्वे विभागाने घोषणा केली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचा विषय असलेल्या अहमदनगर-बीड-परळी रेल्वे लाईन ही क्रमांक दोन नंबर वर असून त्याकरिता 200 कोटी रुपये जाहीर करण्यात आलेले आहे. 367 कोटी रुपये डिपॉझिट या रीतीने अहमदनगर-बीड-परळी करिता या बजेटमध्ये 567 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहे. तर दौंड-मनमाड दुहेरी लाईनकरिता 500 कोटी रुपये जाहीर करण्यात आले  आहे. अहमदनगर स्थानकची जंक्शनच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष तथा सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य हरजीतसिंह वधवा यांनी दिली.
पुणे-नाशिक नवीन रेल्वे लाईन दोन वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेली होती. परंतु त्याकरिता यावर्षी कुठलीही निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे संगमनेरकर यांना यावर्षी रेल्वेचे कार्य सुरू होणार असल्याचे स्वप्नच राहणार आहे. पुणतांबा रोटेगाव या रेल्वे लाईन करिता देखील कुठलेही पैसे देण्यात आले नसल्याचे वधवा यांनी सांगितले आहे. याबद्दल अधिक बोलताना वधवा यांनी या वर्षी अहमदनगर जिल्ह्यात ट्रॅकच्या मजबुतीकरणकरिता पैसे देण्यात आलेले आहेत. तसेच नगर-बीड-परळीला आष्टीच्या पुढे कामाला अधिक वेगाने चालना मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार सुजय विखे यांच्याकडून सतत पाठपुरावा होत असल्याने दुहेरीकरणामुळे तसेच आष्टी रेल्वे सुरू झाल्याने अहमदनगर स्थानक हे जंक्शन होईल. सध्या नवीन रेल्वे गाड्या या बजेट मध्ये जाहीर करण्याची प्रथा बंद केली असून, लवकरच नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यात येण्याची मागणी अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेने केली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तर रेल्वेच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध केल्याबद्दल रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव व रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे तसेच निधीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल खासदार सुजय विखे यांचे अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.