केदारकंठ शिखर दोन दिवसात सर करणार्‍या अबशाम पठाण या विद्यार्थ्याचा सन्मान

स्वर्गीय मा.आ. अनिलभैय्या राठोड विचार मंच, जे.एस.आय. फाऊंडेशन, पप्पूशेठ इनामदार मित्र मंडळ, शहाजी रोड व्यापारी असोसिएशन आणि हातगाडी असोसिएशनच्या वतीने शहरातील 13 वर्षाच्या अबशाम फिरोज पठाण याने उत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या रांगेत असलेल्या बारा हजार पाचशे फुट उंचीचे केदारकंठ शिखर दोन दिवसात सर केल्याबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला.
शहाजी रोड येथे प्रजासत्ताकदिनी झालेल्या कार्यक्रमात पठाण यांचा सत्कार भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी वसंत लोढा यांच्या हस्ते झाला. यावेळी विचार मंचचे अध्यक्ष इरफान राठोड, शिवसेनेचे आनंदभाऊ लहामगे, जैन युवक फेडरेशनचे ईश्‍वर बोरा उपस्थित होते. केदारकंठ शिखर सर करण्यासाठी तीन दिवस लागतात. मात्र अबशाम पठाण याने हा शिखर दोन दिवसात सर केला तर एका दिवसात तो गेलेल्या मार्गाने परतला. तो कर्नल परब शाळेचा इयत्ता सातवी मधील विद्यार्थी असून, अहमदनगर जिल्हा पालक संघटनेचे सचिव असगर सय्यद यांचा नातू आहे. या कामगिरीचे विशेष कौतुक करुन पठाण याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.