बलात्कार करणार्‍या आरोपीला उमेदवारी जाहीर करुन समाजबांधवांच्या जखमेवर मीठ चोळले -सुशांत म्हस्के

आरपीआय, आंबेडकर चळवळीतील घटक पक्ष व संघटनेची पत्रकार परिषद

लैंगिक शोषण झालेल्या मागासवर्गीय महिलेला आजी-माजी मंत्रींच्या राजकारणामुळे न्याय मिळण्यास उशीर होत आहे. यामधील आरोपीचा सत्ताधारी राज्य मंत्री बचाव करत असल्याने त्याला अटक होत नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे बलात्कार करणार्‍या आरोपीला उमेदवारी जाहीर करुन समाजबांधवांच्या जखमेवर मीठ चोळले असून, याचा आरपीआय, आंबेडकर चळवळीतील सर्व घटक पक्ष व संघटना निषेध करीत आहे. आरपीआय तृतीय पंथीय आघाडीच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करणार असल्याचा इशारा आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी दिला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई), आंबेडकर चळवळीतील घटक पक्ष व संघटनेच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मागासवर्गीय महिलेला अत्याचार प्रकरणात न्याय मिळण्यासाठी भूमिका विशद करण्यात आली. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष म्हस्के बोलत होते. याप्रसंगी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे सुमेध गायकवाड, ऑल इंडिया पँथर सेनेचे योगेश थोरात, आरपीआय (आठवले) शहराध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, लोकशाही विचार मंचचे सोमनाथ शिंदे, पीआरपीचे अतुल भिंगारदिवे, दलित महासंघाचे सुरेंद्र घारु, रोहित आव्हाड, आरपीआय कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, ओबीसी घाडीचे विजय शिरसाठ, संतोष पाडळे, विकी प्रभळकर, सोनू भंडारी, प्रकाश कांबळे, किरण जाधव आदी उपस्थित होते.
पुढे सुशांत म्हस्के म्हणाले की, मागासवर्गीय महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणी आरोपी गोविंद अण्णा मोकाटेवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टप्रमाणे वाढीव कलम लावून त्याला त्वरीत अटक करण्याची मागणी आरपीआयच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या प्रकरणात मागासवर्गीय महिलेला न्याय मिळण्यासाठी सर्व आंबेडकरवादी घटक पक्ष व संघटना एकवटल्या आहेत. राजकीय वलय असल्याने आरोपीला अटक केली जात नसून, यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहे. लैंगिक शोषणाला हनी ट्रॅपचे वळण देऊन महिलेला न्यायापासून वंचित ठेवण्याचे पाप करुन पिडीतेवर देखील संशय घेतला जात आहे. हा प्रकार लैंगिक शोषणाचा असून, पिडीतेला न्याय मिळण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे भाऊ सुंदर मोकाटे प्रत्येक प्रकरणात आरपीआय कशी? हा प्रश्‍न उपस्थित करत असले तरी, वंचित, पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच आरपीआयचा पुढाकार राहणार असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले. तर महिलेला न्याय मिळण्यासाठी आंदोलन देखील उभे करणार असल्याचा इशारा दिला. पिडीत महिला इतर समाजाची असती तर उमेदवारी जाहीर केली असती का? हा प्रश्‍न उपस्थित करुन, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आरोपीची बाजू घेत असल्याचा आरोप केला.
सत्ताधारी व विरोधकांच्या राजकारणाने पिडीत महिला न्यायापासून दुरावत आहे. या प्रकरणात आमच्या बाजूने कोणी नसल्याचे स्पष्ट केले. पिडीत महिलेचा व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करणार्‍यावर देखील कठोर कारवाई करण्याचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात येणार आहे. या प्रकरणात कुणीही राजकारण करुन पुढार्‍यांनी हस्तक्षेप करु नये, असा इशारा दिला. तर या प्रकरणी शिवसेना पक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून सदर प्रकरणी निपक्षपाती चौकशी करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अमित काळे यांनी सत्ताधारी विरोधकांच्या राजकारणाने दलितांचा बळी चालला आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीची उमेदवारी जाहीर करणे ही बाब निषेधार्ह असल्याचे सांगितले. सुमेध गायकवाड यांनी पिडीत महिलेला न्याय मिळण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे होते. मात्र महिला मागासवर्गीय असल्याने इतर समाज व पक्ष पुढे येत नसल्याची शोकांतिका आहे. महिलेवर अत्याचार झाल्यानंतर कॅन्डल मार्च काढले जातात, मात्र न्याय मागणार्‍या महिलेला न्यायापासून वंचित ठेवण्याचा हा गंभीर प्रकार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव घेऊन शिवसेना राजकारण करीत आहे. शिवाजी महाराजांनी बलात्कार करणार्‍यांना कठोर शिक्षा दिल्याचा इतिहास आहे. परंतु शिवसेनेचा कार्यकर्ता असलेल्या गोविंद मोकाटेने महिलेवर अत्याचार केले असून, जिल्हाध्यक्ष बलात्कार प्रकरणातील आरोपीची पाठराखण करुन त्याची उमेदवारी जाहीर करत असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करुन, उपस्थितांनी या प्रकरणाचा निषेध नोंदविला.