रविदास महाराजांचे विचार मानवतावादी होते -आ. संग्राम जगताप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

संतांचे कार्य एका जाती व समाजापुरते मर्यादीत नसून, संपूर्ण मानवजातीसाठी त्यांनी कार्य केले. रविदास महाराजांचे विचार मानवतावादी होते. तेराव्या शतकात संत रविदासांनी मानवतेची शिकवण देऊन अंधश्रध्देविरोधात जागृती केली. त्यांचे विचार व कार्य आजच्या पिढीला दिशादर्शक असून, अनेक महान व्यक्तींनी त्यांना गुरु मानून त्यांनी दाखवलेल्या मार्गाचा स्विकार केल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
संत रविदास महाराजांची 645 व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संभाजी पवार, मयुर भापकर, निलेश बांगरे, ओबीसी सेलचे अमित खामकर, छबुराव कांडेकर, मनोज चोभे, गणेश बोरुडे, सुभाष बगळे, भिकू लसगरे, अशोक शेळके आदी उपस्थित होते. प्रा. माणिक विधाते यांनी रविदास महाराजांनी समतेचा संदेश देऊन आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी कार्य केले. अंधश्रध्देच्या  विरोधात त्यांनी केलेले कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.