लग्नसोहळ्यात नवदाम्पत्यांनी केले वृक्षरोपण

मंगलाष्टके व सप्तपदींच्या सोहळ्यात निसर्ग पूजेची जोड

निमगाव वाघा (ता. नगर) येथील लग्नात नवदाम्पत्यांनी वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. लग्न म्हंटल की, विधी, पूजा, मंगलाष्टके व सप्तपदींचा सोहळा त्याला निसर्ग पूजेची जोड देत स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या पुढाकाराने गावातील मिलन मंगल कार्यालयाच्या आवारात वैशाली भाऊसाहेब डोंगरे व प्रदिप बाळू झरेकर यांच्या विवाह सोहळ्यात वृक्षरोपण अभियान पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, उद्योजक दिलावर शेख, रघुनाथ डोंगरे, राजू जाधव, भाऊसाहेब डोंगरे, बाळू झरेकर, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे आदी उपस्थित होते.

स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या पुढाकाराने निमगाव वाघात सण, उत्सव, लग्न सोहळे व महपुरुषांच्या जयंती कार्यक्रमात वृक्षरोपण अभियान राबविण्याचा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमांतर्गत हा वृक्षरोपण अभियान राबविण्यात आला. नवदाम्पत्यांनी वृक्षरोपणाने पर्यावरण संवर्धनाचा दिलेला संदेश सर्वांनाच भावला.

पै.नाना डोंगरे म्हणाले की, जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, वाढत्या शहरीकरणामुळे झांडांची कत्तल, निसर्गाचा ढासाळलेला समतोल यामुळे दुष्काळासह अवकाळी पाऊस या नैसर्गिक संकटांचा सामना सर्वांना करावा लागत आहे. ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना कोरोनाच्या संकटकाळात समजले. पर्यावरणाचे समतोल साधण्यासाठी आणि ऑक्सिजनची पातळी उत्तम ठेवण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय असून, नवदाम्पत्यांनी वृक्षरोपण करुन समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवल्याचे त्यांनी सांगितले. माधवराव लामखडे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण ही लोकचळचळ होण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी डोंगरे संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेले उपक्रम दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.