वाईन विक्री निर्णयाविरोधात आण्णा हजारे करणार १४ फेब्रुवारी पासुन उपोषण

अहमदनगर — राज्य सरकारने वाईन विक्री संदर्भात घेतलेला निर्णय अतिशय दुर्देवी असुन तात्काळ निर्णय मागे न घेतल्यास दि. १४ फेब्रुवारी पासुन राळेगण येथे आमरण उपोषणाचा इशारा समाजसेवक आण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो निर्णय घेतला आहे त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे.केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. पण या निर्णयामुळे लहान मुले तरुण व्यसनाधीन होऊ शकतो, महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही. युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे हेही आश्वचर्यकारक आहे.

राज्यातील 36 जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे संघटन आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांनी आपणाकडे निवेदन पाठवून जाहीर विरोध दर्शविलेला आहे. तसेच राज्यातील विविध बिगर राजकीय, सामाजिक संघटना आमच्याकडे येत आहेत. चर्चा करीत आहेत. या सर्वांची या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन करण्याची तयारी आहे. तरीही सरकारला जाग येत नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय दिसत नाही.

यापूर्वी आपणास या विषयावर दोन पत्रे पाठविली आहेत. तसेच लोकायुक्त मसुदा समितीच्या बैठकाही टाळण्यात येत आहेत. त्यासंबंधीही काही दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केला आहे. आपणाकडून एकाही पत्राचे उत्तर आलेले नाही. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी हे आमच्या एकाही पत्राला कधीच उत्तर देत नाहीत.पण आता राज्याच्या मुख्यमंत्र्याकडूनही तसेच घडताना दिसत आहे. मी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांना कधीही वैयक्तिक विषयावर पत्र लिहिलेले नाही. व्यापक हिताच्या सामाजिक प्रश्नांवरच मी पत्र लिहित असतो. तरीही त्याचे उत्तर देणे टाळले जात असेल तर सरकारला जनतेच्या हिताशी काही देणेघेणे आहे की नाही? असा प्रश्न उभा राहतो.

लवकरच राज्यातील विविध सामाजिक संघटनांच्या समविचारी कार्यकर्त्यांची एक बैठक राळेगणसिद्धी येथे घेण्यात येणार आहे. त्यावेळी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. सरकारने हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी जनतेची मागणी आहे. अन्यथा मला 14 फेब्रुवारी पासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करावे लागेल. असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

लहान बालक ही आमची राष्ट्रीय संपत्ती आहे. या बालकांमध्ये उद्याचे महापुरूष आहेत. सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे बालकेसुद्धा व्यसनाधीन होतील आणि ते अधोगतीकडे जातील. दुकानामध्ये वाईन आली तर ही आमची संस्कृती धुळीला मिळेल. आणि चंगळवादी, भोगवादी संस्कृती वाढीला लागेल. त्यातून काय काय अनर्थ घडतील सांगता येत नाही. ती अधोगतीकडे नेणारी संस्कृती पहायला नको म्हणून १४ फेब्रुवारी पासून राळेगणसिद्धीमध्ये श्री संत यादवबाबा मंदिरात उपोषण करणार आहे.