राजधानी दिल्लीवर हवा प्रदूषणाचे संकट 

कोरोना व प्रदूषणाने दिल्ली हैराण 

नवी दिल्ली :

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीवर करोनाच्या साथीची उग्र झालेली लाट आणि गंभीर हवा प्रदूषणामुळे दुहेरी संकट निर्माण झाले आहे.   दिल्ली आणि आसपासच्या शहरांमधील वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले असून करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येतही विक्रमी नोंद असल्यामुळे सुमारे तीन कोटी रहिवाशांपुढे आरोग्य समस्यांचे उग्र आव्हान निर्माण झाले आहे.   वाढत्या दैनंदिन रुग्णसंख्येमुळे दिल्ली ही करोना राजधानी होत असल्याची टीका दिल्ली उच्च न्यायालयाने केली आहे.

खरिपाचा हंगाम संपल्यानंतर हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तरांचल या शेजारी राज्यांमध्ये शेतातील कचरा जाळण्याच्या बाबतीत लक्षणीय घट न झाल्याने राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाने हिवाळ्याच्या प्रारंभीच धोकादायक स्तर गाठला आहे.


दिल्ली, गाझियाबाद, नोईडा, गुरगाव आणि फरीदाबाद या शहरांतील सर्वच भागांमध्ये वायू प्रदूषणाची पातळी पाच ते पंधरा पटींनी वाढली आहे. हवा प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे आजार बळावतात. शिवाय, थंडी वाढल्यामुळे करोनाचाही संसर्ग वाढला असून या दुहेरी संकटामुळे दिल्लीतील करोना रुग्णांच्या संख्येत दर दिवशी विक्रमी भर पडू लागली आहे.