चारशे जागांच्या यशात खा. सुजय विखेंच्या रूपाने अहिल्यानगरचा समावेश- भालसिंग

सरकारच्या योजनांची गॅरेंटी देशातील जनतेला आली आहे.

अहिल्यानगर । प्रतिनिधी

सरकारच्या योजनांची गॅरेंटी देशातील जनतेला आली आहे. देशाने पंतप्रधान मोदींचे नेतृत्व स्विकारले आहे. भाजपाच्या नेतृत्वाखाली पुन्हा तिसऱ्यांदा सत्ता येणार असून अहिल्यानगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचाही समावेश चारशे जागांच्या ऐतिहासिक विजयात राहील असा विश्वास अहिल्यानगर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी व्यक्त केला आहे.

नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुती कडून सुरू असलेल्या प्रचाराची माहीती जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

भालसिंग म्हणाले की, मागील १० वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जगाच्या केंद्रस्थानी पोहचविले आहे. मोदींच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात भारत आर्थिक महासत्ता म्हणुन उदयास येईल यात कोणतीही शंका नाही. मोदी सरकारच्या काळात सर्वाधिक लोक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या यामुळेच देशातील ३० कोटीहून अधिक लोक गरिबीतून बाहेर आले. महिलांना अनेक योजनांच्या मार्फत बळकटी देण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय संबंधात सुधारणा झाली. यामुळे मोदींच्या नेतृत्वात भारताची विकसित देशाकडे वाटचाल होत असताना देशाने मोदींवर विश्वास ठेवला आहे लोकसभा निवडणुकीच्या निमिताने मोदीच्या नेतृत्वाखाली झालेले निर्णय मतदारपर्यत पोहचविण्याचे काम प्रचाराच्या माध्यमातून पदाधिकारी कार्यकर्ते करीत असल्याचे सांगितले.