कोरोना संपत असला तरी कोरोनाच्या भितीने न्यायालयाचे कामकाज अतिशय कासव गतीने सुरु असून, सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी आणि न्यायदान प्रक्रियेवरील विश्वास वाढवण्यासाठी कृतीयुक्त कार्य करण्याची गरज असल्याचे पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जीवाच्या आकांताने न्यायाधीश कामापासून दूर राहिल्याने अनेक प्रकरणे प्रलंबीत असून, न्यायव्यवस्था राम भरोसे चालू असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी जिल्हा न्यायालय आणि तालुका स्तरावरील न्यायालयांचे कामकाज पुर्ववत आणि नियमीत सुरु होऊन कायद्याच्या राज्याची प्रचिती येण्याकरिता न्यायव्यवस्थेचा सत्यबोधी सुर्यनामा केला जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली. तर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती आणि कायदे मंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. नवीन वर्ष उजाडून, कोरोना प्रतिबंधक लस आली असली तरी, न्यायाधीश काम करण्यास तयार नाही. न्यायालय नावाला सुरु असून, त्याचा फायदा मात्र न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या पक्षकारांना होत नाही. देशात कोरोनानंतर सर्व व्यवस्था रुळावर येता असून, न्यायव्यवस्था मागे पडत आहे.
