पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथे गुरुवारी घडलेल्या घटनेने संपूर्ण पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. राळेगणसिद्धी परिसरातील एका अशिक्षित मेंढपाळाने दाखवलेल्या धैर्यामुळे महसूल खात्यातील लाचखोरीचे काळे कारनामे पुन्हा एकदा जगजाहीर झाले आहेत.
८ हजारांची लाच घेताना तलाठी रंगेहात पकडला!
नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी छापा टाकून कामगार तलाठी दिपक भिमाजी साठे (वय ३६, रा. हंगा, ता. पारनेर) याला ८ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
हा प्रकार जमीन खरेदीची नोंद सातबारावर करण्यासाठी घडला होता. सातबारा नोंदीसाठी कोणतीही शासकीय फी नसतानाही तलाठ्याने दहा हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीत रक्कम ८ हजार ठरवली आणि शेवटी त्याच सापळ्यात तो अडकला.
प्रकरण नेमकं काय?
कुरुंद येथील गट नंबर ९६ मधील १ एकर २० गुंठे जमीन तक्रारदाराने आपल्या मुलगा, भाऊ आणि पुतण्याच्या नावावर खरेदी केली होती. जमीन कर्जमुक्त झाल्यानंतर रिकन्व्हेन्स डिडची नोंद झाली होती. त्या आधारे सातबारा उताऱ्यावर नोंद व्हायला हवी होती. मात्र तलाठी साठे यांनी “डीजीटल सही माझ्याकडे आहे, मीच नोंद करतो” असे सांगत लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने नगर लाचलुचपत विभागाकडे धाव घेतली. उपपधिक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी चंद्रकांत काळे, शेखर वाघ, किशोर कुळधर आणि चालक दत्तात्रय लाड यांच्या पथकाने योजनाबद्ध सापळा रचला.
लाचखोराचा “ऑडिओ-व्हिडिओ” पुरावा!
तक्रारदाराने केलेल्या संवाद रेकॉर्डिंगमुळे सर्व पुरावे हाती आले. तलाठ्याने “मी दहा म्हटलं होतं, तुम्ही आठ हजार बोला, तेवढे द्या” असे बोलतानाच सर्व काही रेकॉर्ड झाले होते. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने ॲन्थ्रासिन पावडर लावलेले पैसे दिले आणि साठेने खिशात ठेवताच पथकाने त्याला रंगेहात पकडले.
गुन्हा दाखल व शिक्षा
सुपा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोष सिद्ध झाल्यास तलाठ्यास ३ ते ७ वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो.
ग्रामस्थांचा संताप आणि मागणी
या कारवाईनंतर पंचक्रोशीत ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसांना रोज महसूल कामांमध्ये लाच मागितली जाते. लोकांनी जोरदार मागणी केली आहे की – महसूल विभागातील लाचखोरी संपवण्यासाठी सतत धडक कारवाया व्हाव्यात. भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी. शेतकरी, मेंढपाळ आणि सर्वसामान्य नागरिकांचे काम विनामूल्य व्हावे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन
नगर विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे –
“कोणताही सरकारी कर्मचारी लाच मागत असेल तर तात्काळ तक्रार करा! तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल.“
वकिलांची स्पष्ट भूमिका
पारनेर येथील ॲड. तुषार कुलाळ व ॲड. निळकंठ कुलाळ यांनी सांगितले की,
“सरकारी अधिकारी व कर्मचारी जर मेंढपाळ, शेतकरी किंवा सामान्य माणसाकडून लाच मागत असतील तर आम्ही त्यांना विनामूल्य कायदेशीर मदत करू. भ्रष्ट अधिकाऱ्यांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.”
सोशल मीडियावर ग्रामस्थांचा एकच आवाज – “बस्स! आता लाचखोरी सहन करणार नाही”
ही कारवाई मेंढपाळाच्या धैर्यामुळे शक्य झाली असून, खेडोपाडी सामान्य माणूस आता जागा होताना दिसतोय. ही घटना सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लोक थेट प्रतिक्रिया देत आहेत – “हा बदलाचा सुरुवात आहे!” “शेतकऱ्यांनी आता लाचखोरीला बळी पडू नये!” “मेंढपाळाने दाखवलेले धैर्य प्रत्येकाने दाखवले पाहिजे!”