व्यापाऱ्यासाठी विविध सुविधा निर्माण करणार 

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यापारी, हमाल आणि मापाडी यांच्याशी साधला संवाद 

नगर । प्रतिनिधी 

अहिल्यानगरी मधील व्यापाऱ्यासाठी महायुतीच्या सरकारच्या मार्फत विविध सेवा सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. नेप्टी बाजारपेठेतील मधील कांदा मार्केट मध्ये प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी व्यापारी हमाल आणि मापाडी यांच्याशी संवाद साधला. 

डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या लोकसभा मतदार संघात प्रचार सभा, कॉर्नर मिटींग आणि गाठी भेटी देण्यावर भर दिला आहे. याच निमित्ताने ते आज नगर शहरातील कांदा मार्केट मध्ये व्यापारी, हमाल आणि मापाडी यांच्याशी संवाद साधत होते. यावेळी त्याच्यासोबत आमदार संग्राम जगताप, उद्योगपती सचिन कोतकर, अविनाश घुले, निखील वारे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी खा. विखे यांनी व्यापाऱ्यांना विश्वास दिला की, महायुती सरकार हे व्यापाऱ्याच्या जोडीला आहे. व्यापार वाढविण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक मुलभूत सेवा सुविधांवर सरकारच्या वतीने भर दिला जाईल. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा पुरेपुर लाभ व्यापाऱ्यांना मिळण्यासाठी त्यांच्याकडून विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

तसेच नारायन डोह येथील नवीन रेल्वे स्थानकात कांदा व्यापाऱ्यांसाठी रल्वे धक्का निर्माण केला जाईल.त्यामुळे नगर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांना भारतभर कांद्याचा व्यापार करता येईल.विळद येथील नवीन एमआयडीसी मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून कांद्यावर प्रकिया करण्यासाठी प्रोसेसिंग युनिट उभारणी केली जाईल. चिचोंडी पाटील येथे जनावरांचा बाजार उभा करून पशु व्यवसायाला चालणा देण्याचे काम केले जाईल. त्याच कांद्याच्या साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देणार अशा पद्धतीने व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर सरकार दरबारी असलेले हमाल, मापाडी वर्गाचे विविध प्रश्न प्राथमिकतेच्या जोरावर सोडविले जातील असे ही ते म्हणाले.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच गरिबांच्या सोबतीला आहेत. हमाल आणि मापाडी, माथाडी कामगार यांच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कामांची त्यांनी माहिती दिली. व्यापारी वर्गासाठी मोदी सराकारने मागील १० वर्षात विविध योजना आणुन त्या प्रभावीपणे राबविल्या आहेत.यामुळे पुन्हा व्यापाऱ्यांच्या हितासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणे गरजेचे आहे. आपले एक मत हे मोदींच्या पंतप्रधान पदाचा मार्ग बळकट करण्यासाठी आहे. यासाठी महायुतीच्या बीड मधून पंकजा मुंडे आणि नगर मधून आपल्याला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.