उपोषण करुन देखील कारवाई होत नसल्याने आत्मदहनचा इशारा

अनागोंदी करणारे व भ्रष्ट असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- अनागोंदी करणारे व भ्रष्ट असलेल्या अधिकार्‍यांवर जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने उपोषण करुन देखील कारवाई होत नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. अपहारप्रकरणी दोषी आढळ्यानंतर निलंबन करण्यात आलेल्या जिल्हा परिषद विद्युत विभागातील त्या शाखा अभियंताला सेवेतून बडतर्फ करुन त्याच्या मालमत्तेची चौकशी करावी आणि एका ठिकाणच्या बंधार्‍याची तांत्रिक मान्यता घेऊन दुसर्‍या ठिकाणी कामे करणार्‍या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या त्या उपअभियंताची सदर प्रकरणी चौकशी करुन तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषण सुरु आहे. बुधवारी (दि.21 जून) उपोषणाचा तिसरा दिवस होता.
जिल्हा परिषदेचे विद्युत विभागाचे शाखा अभियंताच्या कामकाजाविषयी मध्यंतरी तक्रारी झाल्या होत्या. त्यामध्ये त्रयस्थ यंत्रणेने केलेल्या चौकशी व तपासणीमध्ये ते दोषी असल्याचे व सदर कामात अपहार झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. याच दरम्यान त्यांनी खरेदी व संपादित केलेल्या स्थावर मालमत्तेविषयी तक्रार दाखल असून, त्याप्रमाणे संबंधित अधिकारीला बडतर्फची कारवाई करावी.
तसेच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा जलसंधारण अधिकारी, लघुपाटबंधारे विभाग जिल्हा परिषद यांच्या मार्फत मौजे खादगाव टाकली (ता. नगर) येथील गट नंबर 425, 432 मध्ये सुमारे 20 लाख रकमेचा साठा बंधारा बांधणे बाबत सर्वेक्षण झाले. मात्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता यांनी त्यानुसार काम न करता मनमानी करत ठरलेल्या गट नंबर मध्ये काम न करता त्या ठिकाणापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर लांबच्या जागेवर काम केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीसाठी संघटनेचे जिल्हा परिषद समोर उपोषण सुरु आहे. जिल्हा परिषदचे वरिष्ठ अधिकारी भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारांना पाठिशी घालत असून, त्यांच्यावर कारवाई न झाल्यास शेवटी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहन करणार असल्याचे रोडे यांनी जिल्हाधिकारी यांना बुधवारी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे.