सोलापूर रोडला नऊ दिवस वारकर्‍यांची निशुल्क आरोग्यसेवा

16 हजार वारकर्‍यांनी घेतला लाभ, आरोग्य, सामाजिक व पर्यावरणाच्या प्रश्‍नावर जागृती जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने आषाढी वारीसाठी निघालेल्या पायी दिंडी सोहळ्यातील वारकर्‍यांसाठी नऊ दिवसीय महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. वारी विठुरायाची, काळजी आरोग्याची! या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष होते. नगर-सोलापूर रोड, वाकोडी फाटा येथे तब्बल नऊ दिवस निशुल्क वारकर्‍यांना आरोग्य सुविधा देऊन आरोग्य, सामाजिक व पर्यावरणाच्या प्रश्‍नावर जागृती करण्यात आली. या आरोग्य सेवेचा दिंडीतील 16 हजार वारकर्‍यांनी लाभ घेतला.
विविध भागातून आलेल्या दिंड्या शहरा जवळील नगर-सोलापूर मार्गाने पंढरपूरला आषाढी वारीसाठी जात असतात. त्यांच्या आरोग्यासाठी फाऊंडेशनच्या अध्यक्षा अंबिका बनसोडे, सचिव डॉ. धनाजी बनसोडे व खजिनदार अरुण लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. ऊन, थंडी, वारा, पाऊसाची तमा न बाळगता अविरतपणे पायी दिंड्या पंढरपूरला विठ्ठलच्या दर्शनाला जात असताना यामध्ये अनेकांना सर्दी, खोकला, तापचा त्रास जाणवतो. तर काहींना शारीरिक इजा झाल्यास या आरोग्य शिबीराच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, फळ, बिस्किटचे वाटप करण्यात आले. तर वारी आरोग्यदायी होण्यासाठी वारकर्‍यांना मास्क, सॅनिटायझर, जखमेसाठी औषध, अंगदुखी साठी औषधी तेल, मलम वाटप करण्यात आले. झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा, मतदानचे महत्त्व, मोबाईलचा वापर टाळा, छोटे कुटुंब सुखी कुटुंब, कॅन्सर बाबत जनजागृती करण्यात आली. तर मोतीबिंदू, क्षयरोग, कुष्ठरोग, माता सुरक्षित घर सुरक्षित आरोग्याची माहिती देण्यात आली. या नऊ दिवसीय उपक्रमासाठी हरिभाऊ कडिले, राहीनज, गोरक्षनाथ गवळी, अमोल जगताप, गोरख चठ, रमेश केदार, कामिनी पंकज दास, संदीप राहिंज, समीर आढाव, डॉ. संतोष गिर्‍हे, अनिल राहिंज, आसाराम धुरवडे, गणेश जवळकर, श्रावणी एजन्सी, विशाल एजन्सी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबीर यशस्वी करण्यासाठी देणगीदारांनी विशेष सहयोग देऊन वारकर्‍यांची सेवाही केली.