कॉलनीतील भटक्या कुत्र्यांच्या विरोधात याचिका

अहमदनगर – आपण अनेक वेळा एकले असेल एखाद्या व्यक्तीवर किंवा संस्थेवर गुन्हे दाखल झालेले परंतु अहमदनगरमधील एका वकीलाने चक्क कॉनलीतील भटक्या कुत्र्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केलीये. या वकिलाला कुत्र्यांच्या विरोधात थेट न्यायालयाचे दार का ठोठावं लागलंय.
अहमदनगर  शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हेरीटेज आणि लीना पार्क सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास एवढा वाढलाय की, आपल्या मुलभूत हक्काचे हनन होत असल्याचे म्हणत सोसायटीतच राहणाऱ्या अ‍ॅड सत्यजीत कराळे पाटील या वकिलाने थेट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलीये.

दुचाकीचे सीट फाडणे,चारचाकी वाहनांवर चढून नुकसान करणे, सोसायटीत येणाऱ्या नागरिकांवर धावून जाणे, पार्किंगमध्ये खेळण्यासाठी जाणाऱ्या लहान मुलांवर हल्ला करणे , बाहेरील कचऱ्यातून खाद्यपदार्थ सोसायटीत आणणे असे उपद्रव या भटक्या कुत्र्यांकडून सुरू आहेत. याबाबत वारंवार अहमदनगर महापालिकेला लेखी तोंडी तक्रारी करून देखील याकडे महानगरपालिकेचे प्रशासन लक्ष देत नसल्याचं स्थानिकांचं रहिवाशांचे म्हणणं आहे.

दरम्यान अहमदनगर महापालिकेच्या प्रभारी सॅनेटरी अधिकाऱ्यांशी याबाबत विचारणा केली असता , महापालिकेचे पिंपळगाव माळवी येथे सेल्टर होम असून कायदेशीर पद्धतीने कुत्र्यांची नसबंधी करून त्यांना सोडून दिलं जात असल्याचे त्यांनी आपले म्हणणे मांडले  आहे. मात्र त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.

दरम्यान औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड सत्यजीत कराळे पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे, न्यायालय नेमकी यावर काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.