बिबट्या केला गायीच्या गोठ्यात जेरबंद

सध्या बिबट्याचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वावर वाढलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. काल राहुरी तालुक्यातील ताराबाद परिसरात कारभारी औटी यांनी मोठ्या धाडसाने बिबट्याला गायीच्या गोठ्यात कोंठून ठेवले. कारभारी औटी यांच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे.
राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात काही महिन्यांपासून बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. मागील महिन्यात वन विभागात कार्यरत असलेले ताहराबाद येथील लक्ष्मण किनकर हे बिबट्याच्या हल्ल्यात मयत झाले. तालूक्यातील ताहाराबाद येथील कारभारी कोंडाजी औटी यांच्या जणावरांच्या गोठ्यात काल दिनांक ६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एक बिबट्या औटी यांच्या गायांच्या गोठ्यात शिरला. यावेळी परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. कारभारी औटी यांनी धाडस करून गोठ्याचे गेट बंद करून घेतले. आणि बिबट्याला गोठ्यात कैद केले. वन विभागाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. राहुरीचे वनपरीक्षेत्र अधिकारी गायकवाड हे आपल्या ताफा घेऊन घटनास्थळी पोहोचले. तसेच माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना देखील पाचारण करण्यात आले.
वन विभाग कर्मचाऱ्यांनी रात्रीची वेळ असताना देखील पिंजरा आणून बिबट्याला अलगद पिंजऱ्यात कैद केले. बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केले होती. बिबट्याला पकडण्यासाठी राहुरी येथील सर्पमित्र व वन्यजीव प्रेमी कृष्णा पोपळघट, मुजीब देशमुख, गुलाब शेख, चांगदेव किनकर, किरण उदावंत, नारायण झावरे, सुनिल औटी, बाळासाहेब झावरे, सुभाष औटी, सुखदेव औटी यांनी देखील बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला महत्वाचे सहकार्य केले. रात्री उशीरा दोन वाजता बिबट्या जेरबंद करण्यात यश आले. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
ताहाराबाद परिसरात आणखी काही बिबट्यांचा वावर असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.