राजकीय विरोधकांना शरणार्थी बनविण्यासाठी भाजप ईडीचा वापर शस्त्र म्हणून करत आहे -अ‍ॅड. असिम सरोदे

पीस फाऊंडेशन आयोजित ईडी चे वादळ या विषयावर चर्चासत्रात ईडीच्या यश-अपयशावर विचारमंथन

राजकीय विरोधकांना शरणार्थी बनविण्यासाठी भाजप अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर शस्त्र म्हणून करत आहे. 2014 नंतर मोठ्या प्रमाणात सूड घेण्याच्या भावनेने कारवाया करण्यात आल्या. शरणागती पत्कारा किंवा भाजपमध्ये या, अशा पध्दतीने ईडीला हाताळले जात आहे. ईडीच्या कारवाईत गुन्हा सिध्द झाल्याच्या आकडेवारीनूसार या कारवाया संशायाच्या भोवर्‍यात विचार करायला भाग पाडणारे असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. असिम सरोदे यांनी केले.
पीस फाऊंडेशनच्या वतीने सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे ईडी चे वादळ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना अ‍ॅड. सरोदे बोलत होते. यावेळी अशोक सब्बन, अ‍ॅड. सुभाष लांडे, संजय झिंजे, अन्सार सय्यद, प्रा. बापू चंदनशिवे, अ‍ॅड. रविंद्र शितोळे आदी उपस्थित होते.


पुढे अ‍ॅड. सरोदे म्हणाले की, ईडीच्या बीएमएलए कायद्यांतर्गत 2014 नंतर कारवायांचा विस्फोट झाला. राजकीय कारणासाठी सत्ताधार्‍यांची त्याचा विपर्यास करुन, या कायद्याचे कौशल्याने वापर करत आहे. मनी लॉन्ड्रिंग कारवाई अंतर्गत 2014 ते 2018 या वर्षात ईडीने 347 कारवाया केल्या. यामध्ये 130 जणांना अटक करण्यात आली. तर फक्त 9 जण यामध्ये दोषी आढळले. तर 2005 ते 2014 पर्यंत या कारवाईची आकडेवारी अवघे 104 केसेस होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली कारवाईमध्ये दोषी आढळण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. भाजप हा राजकीय कोंडवाडा बनला आहे. मस्तवाल झालेल्या राजकीय पुढार्‍यांना ईडी मागे लाऊन भाजप मध्ये येऊन स्वच्छ व्हा, अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याचा धाक निर्माण करण्यात आला आहे. ईडीच्या कारवाईने त्या व्यक्तीचे राजकीय व सामाजिक जीवन उध्दवस्त करुन, त्या व्यक्तीविरोधात लोकांमध्ये संशय निर्माण करण्याचे काम केले जात आहे. राजकीय कारणासाठी ईडीचा गैरवापर होत असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले. अशा पध्दतीने कायदे व केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत असल्याने लोकशाहीची प्रकृती बिघडणार आहे. ईडीचे यश-अपयश नागरिकांनी ओळखण्याची गरज असून, नागरिकांना यंत्रणेला जाब विचारण्याची वेळ आहे. महाराष्ट्रात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे मनी लॉन्ड्रिंग दाखवून ईडीची कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतिहासात अभूतपूर्व घटना की, केंद्र सरकारला शेतकरी आंदोलनामुळे तीन कायदे मागे घेण्याची वेळ आली आहे. ही सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या लढ्याचा विजय आहे. सर्वच राजकीय पक्षात भ्रष्टाचारी पुढारी असल्याने हतबल झालेले पक्ष या विरोधात लढाई करण्यास तयार नाही. जनतेने गप्प न राहता कायद्याची पायमल्ली करणार्‍या विरोधात आवाज उठविण्याचे आवाहन त्यांनी केले. तर ईडीच्या स्थापनेपासून ते गुजरातपासून सुरु झालेले हवाला प्रकरणाची माहिती अ‍ॅड. सरोदे यांनी दिली.


प्रास्ताविकात पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष अर्शद शेख यांनी राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी ईडी यंत्रणा हाताळली जात आहे. विरोधी पक्षच नसावा अशी धारणा सत्ताधार्‍यांची झाली आहे. आमच्यात येऊन पवित्र व्हा, अन्यथा जेलमध्ये जा! हा पवित्रा सत्ताधारी घेत आहे. देशातील इतर महत्त्वाच्या प्रश्‍नांना बगल देण्यासाठी अभिनेत्री कंगना राणावत, हिंदू-मुस्लिम दंगे या बातम्या पेरल्या जात आहे. तर सत्ताधारी हुकुमशाही पध्दतीने जनतेचे शोषण करत आहे. नागरिकांना जागृक करण्यासाठी पीस फाऊंडेशन विविध विषयावर चर्चासत्र घेत असून, हा चौथा चर्चासत्र असल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. अनिल सरोदे निवडून आल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कॉ.महेबुब सय्यद यांनी केले.