वीज वितरण कंपनीचा गलथान , भ्र्ष्ट आणि निष्पाप जीवांचे बळी घेणारा सुलतानी कारभार न थांबल्यास कार्यालयाचे विजेचे कनेक्शन तोडून अधिकाऱ्यांना कोंडून शिवसेना करणार टाळे ठोकण्याचे आंदोलन

नगर शहरातील वीज वितरण कंपनीचा कारभार गलथान , भ्रष्ट, तुघलकी आणि निष्पाप जीवांचे बळी घेणारा झाला आहे . कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी वीज बिल वसुलीच्या नावाखाली ग्राहकांचे वीज मीटरच काढून नेऊन सुलतानी पद्धतीने वसुली करीत आहे.
       हा गैरकारभार न थांबल्यास  शिवसेना वीज वितरण कंपनीच्या प्रत्येक सब स्टेशन च्या कार्यालयाचे  वीज कनेक्शन तोडेल आणि अधिकाऱ्यांना कोंडून टाळे ठोकण्याचे आंदोलन शिवसेना स्टाईल ने करेल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.   शिवसेनेचे माजी नगरसेवक विक्रम अनिल भैय्या राठोड यांच्या नेतृत्वाखाली महावितरण चे अधीक्षक अभियंता काकडे यांची भेट  घेऊन त्यांना हे निवेदन देण्यात आले . शिवसेनेचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर , शहर जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव तसेच नगरसेवक  मदन आढाव , दत्ता जाधव , अमोल  येवले आदी उपस्थित होते. 
            या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की कालच शॉर्ट सर्किट मुळे नगरच्या चितळे रोड येथील दत्त बेकरीला भीषण आग लागली व मोठी वित्त हानी झाली.    मध्यंतरी शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांचा २९ वर्षीय विवाहित मुलाला त्याच्या राहत्या घरी पावसाळी दिवसात विजेचा जबरदस्त धक्का बसला. त्यात तो जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेची पोलीस व  महावितरण ने रीतसर चौकशी केली. त्यात स्थानिक केबल नेटवर्क सेवा देणाऱ्याने त्यांच्या दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत खिडकीला वायर बांधली होती. ती वायर चौकातील डीपीवरून आली होती. त्यात ३३ के व्ही चा करंट होता. त्याला त्याचाच झटका बसला.
   मागील महिन्यात अहमदनगर महानगर पालिकेच्या मार्फत ठेकेदाराच्या सांगण्यावरून सूचना फलकाचा फ्लेक्स लावण्यास गेलेला  सौरभ चौरे महावितरणच्या तारेला चिटकला. व तेथेच तो फ्लेक्स वरून कोसळला. याच मालिकेत २०१९ मध्ये पोलीस मुख्यालयात विजेचा शॉक लागून एका मुलीचा बळी गेला. 
   या सर्व घटनांना वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार जबाबदार आहे .  चौकशीत सर्व सिद्ध होऊन देखील कोणावरच कारवाई होत नाही. या घटनांमध्ये ज्या निष्पाप तरुण तरुणीचा मृत्यू झाला ते कमावते होते. आपल्या वयस्कर मातापित्यांच्या एकमेव आधार होते. त्यांच्यावरच संपूर्ण कुटुंब अवलंबून होते. ऐन तरुणाईत त्यांनी आपल्या काळजाच्या तुकड्याला गमावल्यामुळे ते सर्वजण हतबल झाले आहेत. तसेच ते न्याय मागत आहेत. 
त्यामुळे महावितरणने  त्यांना तात्काळ  २५ लाखाची सानुग्रह मदत करावी व दोषींवर कारवाई करून त्यांना अटक होण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशन ला पत्र द्यावे . 
 चवथी घटना तर माणुसकीला काळिमा फासणारी आहे. नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दिवाळीच्या दिवशी शॉर्ट सर्किट मुळे आय सी यु युनिटला आग लागली . त्या जळीत कांडात १४ निष्पाप कोरोनाग्रस्त वृद्धांचा बळी गेला. या घटनेला सर्वस्वी वीज वितरण कंपनीचा भ्रष्ट्र आणि गलथान कारभारच जबाबदार आहे.  हे चौकशीअंती सिद्ध झाले आहे. 
वीज वितरण कंपनीने एक्स्प्रेस फिडर द्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयाला जे विजेचे कनेक्शन दिले . ते सिंगल युजर असते पण कायदा मोडून आणि सावर्जनिक बांधकाम विभागाच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष करून कंपनीने भ्रष्ट जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पत्रावरून नव्याने झालेल्या धर्मादाय स्वरूप असून खाजगी पद्धतीने चालवीत असेलेल्या कुप्रसिद्ध साईदीप हॉस्पिटलला यातून विजेची दुसरी जोडणी दिली. त्यामुळे या फिडरवर अतिरिक्त ताण आला व शॉर्ट सर्किट झाले आणि आय सी यु ला आग लागली. अवघ्या १० मिनिटात होत्याचे नव्हते झाले. राज्यासह केंद्राने या घटनेची दखल घेतली . चौकशी देखील झाली. कारवाईचा अहवाल आला. पण तो दडपण्यात आला. 
ज्या निष्पाप जीवांचा या घटनेत बळी गेला त्यांना कोणीच वाली उरला नाही . आता ते पीडित कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. पण कारवाई शून्य आहे. 
या सर्व घटनातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांची रवानगी तुरुंगात करावी. अशी मागणी करण्यात येत आहे. 
सध्या कोरोना  आणि ओमायक्रोनमुळे लोकडाऊनचे संकट सर्वावर आहे. उद्योगधंदे बंद पडून हजारो कुटुंब बेरोजगार झाले आहेत. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीने लोकांना सरासरी वीज बिलाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिले पाठवली आहेत. आणि त्याची वसुली पठाणी पद्धतीने करण्यात येते आहे. वीज बिल न भरल्यास किंवा ऑनलाईन भरले असले तरी त्यांची नोंद वीज वितरण कंपनीकडे होण्यास थोडा विलंब लागत असला तरी त्यासाठी न थांबता कर्मचारी वीज मीटर काढून नेट ग्राहकांना सुलतानी   संकटात टाकत आहेत. 
महावितरण ने अशाप्रकारे वसूली थांबवावी व माणुसकीच्या नात्याने ग्राहकाना वागणूक द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा शिवसैनिक आपला हिसका दाखवतील . तरी आपण या निवेदनाचा सकारात्मक विकार करून योगी ती कारवाई करावी अन्यथा येत्या सोमवारी अधिकार्‍यांना कार्यालयात कोंडून टाळे ठोकन्याचे आंदोलन केले जाईल . असा इशारा देण्यात आला आहे.