
महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग अखेर होणारच आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत २०,७८७ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय झाला. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवासाचा कालावधी तब्बल १८ तासांनी कमी होणार असून तो २६ तासांवरून थेट ८ तासांवर येणार आहे.
महामार्ग लांबी: ८०२.५९२ किमी
कनेक्ट होणारे जिल्हे: वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग
राज्य खर्च: २०,७८७ कोटी रुपये
हा महामार्ग पवनार (वर्धा) पासून पत्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र-गोवा सीमेपर्यंत जाणार आहे आणि कोकण द्रुतगती महामार्गाशी जोडला जाणार आहे.
धार्मिक आणि तीर्थक्षेत्रांना जोडणी:
- माहूर
- तुळजापूर
- कोल्हापूर
- अंबेजोगाई
- औंढा नागनाथ
- परळी वैजनाथ
- पंढरपूर (श्री विठ्ठल-रुक्मिणी)
- अक्कलकोट
- गाणगापूर
- नरसोबाची वाडी
- औदुंबर
या सर्व तीर्थक्षेत्रांना हा महामार्ग थेट जोडणार आहे.
कोल्हापूर शेतकऱ्यांचा विरोध कायम
कोल्हापूरचे मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या विरोधाचा मुद्दा मांडला. कोल्हापुरात आधीच समांतर मार्ग असल्यामुळे शक्तिपीठ महामार्ग कोल्हापुरातून जाण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार सुरू आहे. या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.
महत्त्वाची बाब: गेल्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी भूसंपादन स्थगित करण्यात आले होते. आता सरकारने पुन्हा हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे.