समाजघातक लोक सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मतदाना इतका मुलभूत कर्तव्याचा भाग म्हणून डिच्चूकावा तंत्राचा वापर करण्याचे आवाहन

भाडभ्रष्ट व जातीमंडूक मतदारांमुळे स्वातंत्र्योत्तर काळात असतित्वात आलेली भांडवलदार घराणेशाही संपविण्यासाठी निवडणुक प्रक्रियेत मतदाना इतका मुलभूत कर्तव्याचा भाग म्हणून डिच्चूकावा तंत्राचा वापर होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. भांडवलदार घराणेशाहीने सर्वसामान्यांना सामाजिक आर्थिक न्याय देणारी लोकशाही राबविता आली नसल्याचा आरोप करुन, समाजघातक लोक सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा तंत्र अवलंबिला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.


उद्योगक्षेत्रात भाग भांडवलाच्या माध्यमातून मोठ्या कंपन्या उभ्या करता येतात. परंतु त्यांना मिळणारा नफा हा भांडभ्रष्ट भांडवलदार घराणेशाहीपेक्षा कधीही जास्त नव्हता. भांडवलदार घराणेशाहीच्या माध्यमातून अनेक पिढ्या देशातील सत्ता स्वतःच्या ताब्यात ठेवली आहे. परंतु यापुढे भाग भांडवलदार घराणेशाही संपवण्यासाठी सर्वच मतदारांनी डिच्चूकावा या नव्या तंत्राचा वापर करण्याची गरज आहे. देशात लोकशाही पेक्षा भाडभांडवलदारशाही राबविली जाते. त्यामुळे पूर्वीच्या राजेशाहीचे विकेंद्रीत असे घराणेशाहीचे राज्य सगळीकडे सुरू असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
रोजगार, शिक्षण, आरोग्य, निवारा आणि कायद्याचे राज्य याबाबी देशभरात आणि सर्वसामान्य माणसाच्या वाट्याला येत नाहीत. भाडभांडवल घराणेशाही ही आत्मकेंद्रीत सत्तास्थाने आहेत. त्याला भाडभ्रष्ट आणि जातीमंडूक मतदार अल्पफायद्यासाठी सहकार्य करतात. त्यामुळे यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा डिच्चूकावा तंत्राचा वापर प्रत्येक मतदाराने राबविण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. तर डिच्चूकावा तंत्राचा वापर प्रत्येक निवडणुकीत करण्याचे मतदारांना आवाहन त्यांनी केले.
देशातील 70 टक्के लोक केंद्र व राज्य सरकार राबवित असलेल्या योजनांच्या माहितीपासून दूर आहेत. त्यामुळेच भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. भारतातील जाती संस्थांचे मूळ हे शिक्षणाचा आणि राष्ट्रकेंद्रित संस्काराच्या अभावात आहे. सर्वसामान्य जनता फक्त आलेले दिवस पुढे ढकलत असून, माहिती गंगेपासून भारतीय समाज दूर आहे. त्यामुळे संघटनेच्या वतीने डिच्चूकावा तंत्राचा व्यापक प्रसार सुरू केला असल्याचे म्हंटले आहे.