कांदा निर्यात बंदी उठविलेल्या निर्णय स्वागतार्ह- ना. विखे पाटील

सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध

नगर ।प्रतिनिधी

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठविलेला निर्णय स्वागतार्थ असून सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करत मोदी सरकारचे अभिनंदन केले.

मागील काही महिन्यापासून राज्यात कांदा निर्यातीवर बंदी होती. यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. शनिवारी केंद्र सरकारने ही बंदी संपुष्टात आणून 99,150 मेट्रिक टन कांद्याची निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे शेतकरी सुखावला असून या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला. महायुती सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सरकारने पुन्हा एकदा दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

बंदीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे बंदी उठविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. शेतकऱ्यांना आता युएई, भूतान, बहरीन, मॉरिशस, आणि श्रीलंका या सहा देशात कांदा निर्यात करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.