शेवगावात डॉ. सुजय विखे यांचा डंक्का

प्रचार दौऱ्यातून साधला लोकांशी संवाद

शेवगांव । प्रतिनिधी

अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचारात मोठी मुसंडी घेतली आहे. नियमित कार्यकर्ते, मतदारांच्या गाठी भेटी घेत असल्याने त्यांचे समर्थन वाढत आहे. याच धर्तीवर त्यांनी शुक्रवारी शेवगांव शहरात आपल्या प्रचार सभा घेतल्या असता शेवगांवातही त्यांचा डंक्का दिसून आला. यावेळी त्यांच्या सोबत आमदार मोनिकाताई राजळे, अरुण मुंडे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हे शेवगांव शहरातील नागरिकांच्या गाठी भेटी घेत आहेत. त्यांनी फर्टीलायझर असोशियशन यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी फर्टीलायझर व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांशी संवाद साधत विविध प्रश्नांवर चर्चा केली. तसेच येणाऱ्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडविले जातील असे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर शेवगांव न्यायालय परिसर येथे वकील संघटनेशी बैठक घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या लवकरच मार्गी लावल्या जातील असे आश्वासन दिले.

सायंकाळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते क्रांती चौक – छ. शिवाजी महाराज चौक – श. भगत सिंग चौक पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधत देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत आणि औक्षण करण्यात आले. यावेळी या पदयात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला, वृद्धांनी सहभाग घेतला होता.

यानंतर त्यांनी सोनमिया वस्ती येथे भोई समाज, बावडी गल्ली येथे चर्मकार समाज, तर जैन स्थानक येथे जैन समाजांच्या प्रतिनिधिंशी बैठका घेतल्या. यावेळी या समाजातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तर बालाजी मंदिर मारवाडी गल्ली येथे व्यापारी आणि माहेश्वरी समाजीतील नागरिकांशी संवाद साधत त्यांनी आपल्या प्रचाराचा समारोप केला.

सुजय विखे हे समाजातील सर्व घटकांशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद करत आहेत. देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविण्याचे आवाहन करत आहेत. तसेच मागील १० वर्षाच मोदी सरकारच्या माध्यमातून झालेली कामे लोकांसमोर मांडत आहेत. तसेच येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी कोणती कामे केली जाणार यांची माहिती मतदारांना देत आहेत. विकासाच्या मुद्दावर चर्चा करत असल्याने मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने दिसत आहे.