थांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने शेवंगाव तालुका शाखा सुरू करण्यासाठी दुसरी बैठक संपन्न.

 

अहमदनगर प्रतिनिधी  : शेवंगाव तालुक्यातील थांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा नव्या दमाने सुरू होण्यासाठी शब्दगंध च्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना सर्व मिळुन साथ देऊ,त्यासाठी शब्दगंध ची शाखा चांगल्या रितीने सुरू करू असे प्रतिपादन साहित्यिक हरिभाऊ नजन यांनी केले.

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने शेवंगाव तालुका शाखा सुरू करण्यासाठी आयोजित दुसऱ्या बैठकीच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी रंगकर्मी सुभाष जाधव,प्रा.उमेश घेवरीकर,विठ्ठल सोनवणे,प्रा.मफिज इनामदार,राजेंद्र झरेकर, खजिनदार भगवान राऊत,प्रा.डॉ.अशोक कानडे उपस्थित होते. पुढे बोलतांना नजन म्हणाले कि, शेवंगाव ही साहित्यिक व सांस्कृतिक कार्यकत्यांची भूमी आहे,पोषक वातावरण मिळाले तर आपल्या सोबतच तालुक्याचे नावं ही उज्ज्वल होऊ शकते.

प्रास्ताविक करतांना भगवान राऊत म्हणाले कि, मागील बैठकीत झालेल्या नियोजनानुसार आज तालुक्यातील साहित्यिकांचा उत्तम प्रतिसाद असुन अनेक साहित्यिक शब्दगंध सोबत जोडून घ्यायला तयार आहेत,सर्वत्र शाखा सुरू करण्यात येत आहेत.
प्रा.उमेश घेवरीकर म्हणाले कि, मराठी वाचण्याची सवय स्वतः पासुन लावली तर मुलं ही वाचतील,प्रत्येकाने पुस्तकं विकत घेऊन वाढदिवसाला वाटप केल्यास वाचनारांची संख्या आपोआप वाढेल,त्यासाठी शब्दगंध चे प्रयत्न सुरूच आहेत.
शब्दगंध शाखा समन्वयक म्हणून प्रा.उमेश घेवरीकर यांची निवड करण्यात आली.

पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन कार्यकारी मंडळ निवड व कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येईल.यावेळी संस्थापक सुनील गोसावी यांनी शब्दगंध स्थापने पाठीमागचा इतिहास सांगितला. अरुण भारस्कर,महेश लाडने,आत्माराम शेवाळे,विजय हुसळे,शितल हिवाळे,शरद तुपविहिरे, स्मिता सुपारे, पांडुरंग वाव्हळ,शिवाजी सगळे यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून चर्चेत सहभाग घेतला.
प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी आभार मानले. यावेळी शेवंगाव तालुक्यातील नवोदित साहित्यिक उपस्थित होते.