नगर शहरातील उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभा राहणारा – ना. बाळासाहेब थोरात

बाळासाहेंब थोरात यांचे प्रतिपादन

नगर : देशाची अर्थव्यवस्था विकसित व्हायची असेल तर त्यासाठी औद्योगिकीकरण महत्वाचे आहे. उद्योग हा त्याचा आत्मा आहे. नगर शहरातील उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम निश्चितपणे मी करेल, असे प्रतिपादन महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या पुढाकारातून मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या हॉलमध्ये अहमदनगर एमआयडीसीतील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स तसेच आमी संघटनेचे लघु व मोठ्या उद्योजकांची बैठक थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली.

यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, उपाध्यक्ष प्रकाश गांधी, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, मनोज गुंदेचा, खलील सय्यद, अनंतराव गारदे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते पाटील, मच्छिंद्र साळुंखे आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विशेष बैठकीमध्ये उद्योजकांनी अनेक प्रश्न ना. थोरात यांच्या समोर मांडले. ग्रामपंचायत आणि एमआयडीसी या दोन्ही यंत्रणा असून एकाच वेळेला दुहेरी कर आकारला जातो. यापैकी एक तर ठेवण्यात यावा अशी मागणी यावेळी उद्योजक यांच्या वतीने करण्यात आली.

पाण्याची पाईपलाईन जुनी झाल्याने तीसतत फुटते. त्याचबरोबर नगर-मनमाड रस्त्याच्या विस्तारीकरणाची गरज आहे. तसेच एमआयडीसी परिसरामध्ये असणारे ट्रक टर्मिनल मंजूर झाल्यास त्याची उद्योजकांना मदत होईल अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

ना. थोरात म्हणाले की, यातील काही मागण्या राज्य स्तरावरील असल्याने शासन म्हणून त्याचा पाठपुरावा करावा लागेल.

त्या साठी बैठकांचे आयोजन निश्चितपणे केले जाईल. प्रत्येक प्रश्नासाठी ज्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून मार्गी लावण्याचे काम केले जाईल. सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना उद्योजकांच्या मागण्या संदर्भात मध्ये मी लेखी सूचना करणार असून त्यांचा पाठपुरावा देखील करणार आहे, असे आश्वासन यावेळी नामदार थोरात यांनी दिले.