अपंगाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून बढती घेणार्‍या शिक्षकांवर गुन्हे दाखल करावे आरपीआयचे जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन

खोटे प्रमाणपत्र घेऊन बढती घेतल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- अपंगाचे खोटे प्रमाणपत्र मिळवून बढती मिळवून विविध सवलतीचा लाभ घेणार्‍या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने करण्यात आली आहे. तर सदर प्रकरणी चौकशी होण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आरपीआयचे ओबीसी आघाडी प्रमुख विजय शिरसाठ, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष गुलाम अली शेख, भिंगार शहराध्यक्ष राहुल सोळंकी, अभिजीत पंडित, विकी पवार, शिवम साठे, ऋषिकेश विधाते, जावेद शेख आदी उपस्थित होते.


जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात झालेल्या खात्या अंतर्गत बढतीमध्ये 39 अपंग शिक्षकांना बढती मिळाली आहे. त्यामध्ये अल्प दृष्टी, कर्णबधीर व अस्थिव्यंग आहेत. या अपंगांना बढती देताना जिल्हा परिषदेने कोणतीही खातरजमा न करता, अपंगत्वाची पहाणी न करता सरसकट बढती दिली आहे. या अपंगांमध्ये खोटे अपंग आहेत. काही अपंग हे शारीरिक दृष्ट्या सदृढ असून, त्यांच्याकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.


खोटे प्रमाणपत्र मिळवून अपंगांच्या सवलती घेणार्‍यांमुळे खरे अपंगांवर अन्याय होत आहे. या प्रकरणी चौकशी करुन या खोट्या अपंगांचा शोध घ्यावा. प्रत्येक लाभार्थींची पुन्हा शारीरिक तपासणी करुन नव्याने प्रमाणपत्र द्यावे, यामध्ये सदृढ असून देखील अपंग प्रमाणत्र घेतलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आरपीआयने केली आहे. या प्रकरणात दबावाला बळी न पडता कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे