अवघ्या महाराष्ट्राची कूस कृतार्थ झाली, किल्ले रायगड शहारला, शिवबा सिंहासनाधीश्वर झाले…; आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन

आज तिथीप्रमाणे तर 6 जूनला तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. रायगडावर गडदेवता म्हणजे शिर्काई देवीच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ज्यानंतर राज्याभिषेकासाठी ज्या चांदीच्या पालखीचा वापर केला जाणार आहे त्या पालखीचंही पूजन करण्यात आलं. आजच्या दिवशी जगदीश्वराचंही मंत्रोच्चारात शास्त्रोक्त पध्दतीनं पूजन करण्यात आलं. अखंड महाराष्ट्राच्या मनामनात आणि इथल्या भूमीच्या कणाकणात महिरपी रुपात कोरलेला अभिमानास्पद क्षण म्हणजे जाणता राजा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. हा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला, आपले शिवराय राजं झालं…. आणि श्रमिकांच्या, शेतकऱ्यांच्या तसेच गोरगरीबांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले शिवबा सिंहासनावर आरूढ झाले. हे घडत असताना अवघ्या महाराष्ट्राची कूस कृतार्थ झाली, किल्ले रायगड शहारला, झाडांची सळसळ वाढली. पशुपक्षांनी केलेल्या चिवचिवाटाच्या आनंदलहरी अवघ्या महाराष्ट्रावर पसरल्या. सूर्यदेवाने कुर्निसात करत, चंद्रमौळी किरणांचा वर्षाव अवघ्या राज्याभिषेकावर केला. या घटनेला आता 349 वर्षे सरली. मात्र आजही या सोहळ्याचं तेज उत्तरोत्तर वाढत गेलं. अजूनही ही मराठमोळी धरणी या क्षणांच्या आठवणींनी मोहरून जाते. दुर्गराज रायगडवर आज तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याला किल्ले रायगडावर सुरुवात झाली आहे. हा सोहळा 6 जूनपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती आणि राज्य शासनाच्या वतीनं आयोजित या सोहळ्याला गुरुवारी शिर्काईमातेच्या पूजनानं सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभरात रायगडावरील गंगासागर तलाव आणि विविध देवदेवतांचं पूजन करण्यात आलं. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं रायगडावर गोंधळ आणि  विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं.350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावरती मोठी लगबग दिसून येत आहे. अनेकांनी पुढील दोन ते चार दिवसाचा मुक्काम हा किल्ले रायगडावरती केलेला आहे. दरम्यान मोठ्या संख्येने आलेल्या शिवभक्तांची जेवण, न्याहरीची  सर्व सोय किल्ल्यावरतीच करण्यात आलेली आहे. दरम्यान हा एक वेगळा अनुभव असल्याची प्रतिक्रिया इथं आलेल्या शिवभक्तांनी दिली आहे.