बिहारमध्ये गंगा नदीत मोठी दुर्घटना

100 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली

 
पाटणा :
बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया भागात गंगा नदीत 100 प्रवाशांनी भरलेली बोट पलटी झाली. या बोटमध्ये लहान मुलं आणि महिलादेखील होत्या. या बोटीत काही दुचाकी आणि सायकलदेखील ठेवण्यात आल्या होत्या. बोट उलटल्यानंतर काही प्रवाशी पोहत किनाऱ्यावर पोहोचले. मात्र, बरेच जण अजूनही बेपत्ता आहेत.
या दुर्घटनेनंतर किनाऱ्यावरील नागरिकांनी तातडीने बचाव कार्याला सुरुवात केली. त्यानंतर प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मात्र, अद्यापही अनेक जण बेपत्ता आहे. बचाव कार्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
बोटीत प्रवास करणारे सर्वाधिक प्रवासी हे मजूर आहेत. बोट उलटल्यानंतर जे मजूर पोहत किनाऱ्यावर पोहोचले त्यांपैकी काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बोटीतून उडी मारुन जे पोहत सुरक्षितपणे किनाऱ्यावर दाखल झाले, त्यांनी या दुर्घटनेची सविस्तर माहिती दिली.