आरोग्यमंत्री ठेवणार कॅबिनेटमध्ये फटाकेबंदीचा प्रस्ताव

आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं पाऊल

मुंबईः

महाराष्ट्रात फटाक्यावर बंदी आणण्याचा मंत्रिमंडळात प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यावर कोरोनाचं संकट आहे. त्याच पार्श्वभूमीवर फटाक्यांना बंदी घालण्याची भूमिका आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी मांडली आहे.
“फटाकेमुक्त दिवाळी आपल्याला कशी साजरी करता येईल ही मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री आणि कॅबिनेटमध्येही मी याबाबत आग्रह धरणार आहे”, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
“फटाक्यांचा धूर हा आरोग्याला अत्यंत हानिकारक असतो. थंडीमुळे तो धूर वर जाऊ शकणार नाही. त्यामुळे श्वसनाला अधिक बाधा निर्माण होऊ शकते. यासंदर्भात अधिक काळजी घेतलेली बरी आहे, यासाठीच दिवाळीपूर्वीपर्यंत हा नियम लागू करण्याचा माझा आग्रह राहील. मृत्युदर कमी करण्यासाठीही महत्त्वाचे निर्णय घेतले”, असे राजेश टोपेंनी सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली.
कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून फिव्हर सर्व्हेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला.