सी डब्ल्यू सी सदस्यपदी आ. बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याने जिल्हा काँग्रेस कमिटीत चैतन्य!
लवकरच भव्य सर्वपक्षीय नागरी सत्काराचे नियोजन : जयंत वाघ
अहमदनगर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या काँग्रेस वर्किंग कमिटी अर्थात सी डब्ल्यू सी च्या सदस्य पदी नगर जिल्ह्यातून एकमेव माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची फेरनिवड झाल्याने जिल्हा काँग्रेस कमिटीला चैतन्य प्राप्त झाले आहे. असे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयंत वाघ यांनी सांगितले आहे लवकरच त्यांच्या सन्मानार्थ नगर शहर किंवा श्रीगोंदा येथे सर्वपक्षीय भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्याचे ठरविण्यात आले असून त्याचे नियोजन सुरू असल्याचे वाघ यांनी म्हटले आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून १९८५ पासून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या बाळासाहेब थोरात यांची पक्षातील एकनिष्ठ कारकीर्द वडील भाऊसाहेब थोरात यांच्यापासून सुरू झाली. राज्य विधिमंडळात सर्वात सिनियर सदस्य ते आहेत. प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या थोरात यांनी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत निरीक्षक पदाची जबाबदारी सफलतापूर्वक सांभाळली. राज्यात २०१९ मध्ये सर्वात प्रथम त्यांची राष्ट्रीय कार्यकारणी समितीवर सदस्य म्हणून निवड झाली होती त्यावेळी त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात ४४ आमदार निवडून आणले. महाविकास आघाडीच्या स्थापनेत त्यांची भूमिका मोलाची ठरली. त्यांच्या याच कामाची दखल घेत काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी वेणूगोपाल यांनी थोरात यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे निवड जाहीर केली.
हा निवडीबद्दल बाळासाहेब थोरात यांच्या अभिनंदनचा ठराव काँग्रेस पक्षाच्या बैठकीत पारीत करून त्यांनी याबाबतचे पत्र प्रसिद्धीला दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षासाठी महाराष्ट्रातील एक आशावादी नेतृत्व असून काँग्रेस पक्षासाठी मुख्यमंत्रीपदासाठी हाच चेहरा असेल याबाबत कार्यकर्त्यांमध्ये तीळ मात्र शंका नाही. नगर जिल्ह्यात खासदारकीच्या निवडणुकीत त्यांनी नव्हत्याचे होते करून दाखवले. खासदार निलेश लंके आणि भाऊसाहेब वाकचौरे यांना जायंट किलर ही उपाधी त्यामुळे मिळाली. राज्याच्या राजकारणात विलक्षण सक्रियता त्यांनी तन-मन-धनाने दाखवली. २०१४ आणि २०१९ मध्ये खासदारकीत काँग्रेस पक्ष नो व्हेअर असताना २४ ला राज्यात नंबर एकच्या जागा पक्षाने घेतल्या. पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, सोनियाजी गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेश प्रभारी रमेश चेंन्नीथला, राष्ट्रीय सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली राज्यात थोरात साहेबांनी जी रणनीती आखली ती १००% कारगर ठरली. आता विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल यात थोरात यांचा सिंहाचा वाटा असेल. लवकरच त्यांच्या भव्य सर्वपक्षीय नागरी सत्कार समारंभाची तयारी सुरू करण्यात येणार असून थोरात यांनी तारीख दिल्यानंतर नगर शहर किंवा श्रीगोंदा येथे भव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल असे वाघ यांनी म्हटले आहे.