अखेर प्रेमदान हडकोतील अनधिकृत गाळे हटाव मोहीम…..

स्वातंत्र्यदिनी अनागोंदी विरोधी जन-मन आंदोलन जारी

अहमदनगर (वैष्णवी घोडके)
                                महापालिका प्रशासनाने प्रेमदान हडकोच्या पश्‍चिमेला लागून असलेल्या सावेडी सं.नं. 109 मध्ये दक्षिण-उत्तर रस्त्यावर बांधण्यात आलेले अनाधिकृत गाळे पाडण्याची कार्यवाही सुरु केली असल्याचे लेखी पत्र दिल्याने पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला चांदबिबी महालावर होणारे कवटी कडेलोट आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. तसेच स्वातंत्र्यदिनी अनागोंदी विरोधी जन-मन आंदोलन जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.  दोन वर्षानंतरही प्रेमदान हडकोतील रस्त्यावरील गाळ्यांचे अतिक्रमण जैसे थे  परिस्थितीमध्ये होते. प्रेमदान हडकोच्या पश्‍चिमेला लागून असलेल्या सावेडी सं.नं. 109 मध्ये दक्षिण-उत्तर रस्त्यावर अनाधिकृत गाळे बांधून सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले. यामुळे स्थानिक नागरिकांचा रहदारीचा रस्ता बंद झाला आहे. एप्रिल 2019 मध्ये महापालिकेने सदर अतिक्रमण बेकायदेशीर विनापरवाना झाले असल्याचे जाहीर करुन पाडण्याचा हुकूम केला होता.

 

 

 

 

 

                                        दोन वर्षे उलटून देखील सदरचे अतिक्रमण पाडण्यासाठी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. शहरात महापालिका सार्वजनिक जागा व रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांना  अभय देत असल्याचा निषेध नोंदविण्यासाठी संघटनांच्या वतीने आंदोलन जारी करण्यात आले होते. महापालिकेने संबंधीत जागा मालकास नोटीस बजावल्याने गाळ्याचे पक्के बांधकाम हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्यावरील गाळे हटविल्यास नागरिकांना रहदारीचा रस्ता मोकळा होणार असून, संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे. सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात नसल्याने महापालिकेच्या तीन जबाबदार अधिकार्‍यांच्या विरोधात आंदोलन केले जाणार होते.

 

 

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्सस्क्राइब करा.

 

 

                                        मात्र महापालिका प्रशासनाला आंदोलनाच्या इशार्‍यामुळे जाग आली आहे. आंदोलन केल्याशिवाय नागरिकांना त्यांचे हक्क मिळत नाही. नागरिकांना न्याय मिळण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून अनागोंदी विरोधी जन-मन आंदोलन सुरु करण्यात येणार  असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. जन मन आंदोलनासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.