शेख हसीना यांच्या आरक्षणविरोधी निर्णयाने बांग्लादेशात अराजक
शेख हसीना यांना काढावा लागला पळ
ढाका : बांगलादेशात सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला अचानक अत्यंत तीव्र वळण लागले. हिंसक बनलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले आहे. आंदोलकांनी त्यांच्या निवासस्थानामध्ये घुसत तोडफोड केली. यानंतर लष्कराने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी देशाची सूत्रे स्वतःकडे घेत असल्याचे जाहीर केले. लष्कर लवकरच हंगामी सरकार स्थापन करणार आहे. त्यामुळे येथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून भारताच्या या शेजारी देशामध्ये लष्करशाही येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना देशाबाहेर परागंदा झाल्या आहेत.बांगलादेशमध्ये महिनाभरापूर्वी सुरू आणि झालेल्या मागील दोन दिवसांपासून तीव्र झालेल्या या आंदोलनाच्या या वणव्यात सुमारे तीनशे जणांचा मृत्यू झाला. सरकारी नोकरीतील अवाजवी आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी म्हणून विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला तीन आठवड्यांपूर्वी हिंसक वळण लागून त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत आरक्षण घटविले होते. मात्र, मागील तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू करत शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. सरकारविरोधात सुरू केलेल्या या असहकार आंदोलनावेळी पुन्हा हिंसाचार होऊन किमान १०६ जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी आंदोलकांनी ढाक्याच्या दिशेने ‘लाँग मार्च’ची हाक दिली होती. त्यासाठी ढाक्यामध्ये हजारोंच्या संख्येने आंदोलक जमले होते. आंदोलकांना रोखण्यासाठी सरकारने सैन्यालाही तैनात केले होते. तसेच, आज सकाळीच सरकारने देशातील इंटरनेट सेवा ठप्प केली होती. लाखोंच्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घरावर आणि कार्यालयावर हल्ले केले.सरकारला तीव्र विरोध असलेल्या शेकडो आंदोलकांनी हसीना यांच्या सरकारी निवासस्थानात घुसत तोडफोड, लुटालूट केली. आंदोलकांनी शेख हसीना यांचे कार्यालयही जाळून टाकले. त्यानंतर गृहमंत्री असादुझ्झमान खान यांच्या घरात घुसतही तोडफोड केली. हा सर्व प्रकार घडत असतानाच शेख हसीना राजीनामा देऊन परागंदा झाल्याचे वृत्त पसरले. त्यामुळे आंदोलकांनी जल्लोष केला. त्यांनी शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेश मुक्ती संग्रामाचे नेते शेख मुजिबूर रेहमान यांचा पुतळाही हातोड्याने फोडला. देशभरात इतर नेत्यांच्या घरांवरही हल्ले झाले.
शेख हसीना पळून गेल्यानंतर लष्करप्रमुख जनरल वकेर-उझ-झमान यांनी देशाची सूत्रे हंगामी सरकारकडे जात असल्याचे जाहीर केले. ‘हसीना यांनी राजीनामा दिला असून देशातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत. नागरिकांनी सहकार्य करावे,’ असे जनरल झमान यांनी दूरचित्रवाणीवरून बोलत नागरिकांना आवाहन केले. आपण राजकीय नेत्यांना भेटलो आहोत आणि लष्कराच्या हातात सूत्रे घेत असल्याचे त्यांना सांगितले आहे, असेही झमान यांनी सांगितले. झमन यांनी शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या नेत्यांशी मात्र कोणताही संपर्क साधला नसल्याचे समजते.