टाळेबंदीत करपलेल्या झाडांना पाणी देऊन वाचवण्याची धडपड

ग्रामपंचायत सदस्य डोंगरे यांचा वृक्षसंवर्धनाचा ध्यास

अहमदनगर:

उन्हाळ्यातील रणरणते ऊन व टाळेबंदीत नागरिकांना घराबाहेर पडता येत नसल्याने चार वर्षापुर्वी लावलेली झाडे पाण्याअभावी करपली आहे. ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांची स्वखर्चाने पाणी उपलब्ध करुन निमगाव वाघात (ता.नगर) लावलेली झाडे वाचवण्याची धडपड सुरु आहे. फक्त वृक्षरोपण पुरते मर्यादित न राहता वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेत डोंगरे यांनी राबविलेल्या उपक्रमाचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

 

हे ही अवश्य पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा :

 

निमगाव वाघा (ता. नगर) गावातील बिरोबा मंदिर, अमरधाम, नवनाथ विद्यालय आदी गावाच्या परिसरात स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था आणि श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने मागील चार वर्षात तब्बल दीड हजार झाडे लावून जगविण्यात आली आहे. तीन वर्षापुर्वीच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील या झाडांना डोंगरे यांनी पाणी उपलब्ध करुन वाचवले. मागील वर्षी देखील पाऊस चांगला झाल्याने झाडे लावण्यात आली. मात्र सध्या तीव्र उन्हाळा व टाळेबंदीत झाडांना पाणी देता येत नसल्याने लावण्यात आलेली लहान-मोठी झाडे करपू लागली होती.  ग्रामपंचायत सदस्य व डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी स्वखर्चाने टँकर आनून झाडांना पाणी देण्यास सुरुवात केली आहे. तर पावसाळ्याच्या आगमना पर्यंन्त ही झाडे जगविण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे.

 

 

पै.नाना डोंगरे म्हणाले की, शहरीकरणामुळे होणारी वृक्षतोड, औद्योगीकरण व प्रदुषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून, मनुष्याला नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. झाडापासून मिळणार्‍या ऑक्सिजनचे महत्त्व मनुष्याच्या लक्षात आले आहे. तर मयत झालेल्यांच्या अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणात लाकडांची गरज भासली. काही ठिकाणी लाकडे मिळणे देखील अवघड झाले होते. झाडे न लावल्यास भविष्यात मनुष्याला अंत्यविधीसाठी लाकडे मिळणे देखील कठिण होणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येकाने झाडे लाऊन ते जगविण्यासाठी पुढाकार घेणे काळाची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.