शहीद जवानांना अनोखी आदरांजली

कळसुबाई शिखरावर तिरंगी झेंड्याद्वारे साकारला महाराष्ट्राचा नकाशा

सातारा : 

सातारा जिल्हयातील लोणंदच्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या सदस्यांनी देशासाठी शहीद होणाऱ्या जवानांना आदरांजली देण्यासाठी थेट महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसुबाईवर जाण्याचा निर्णय घेतला.  ग्रुपमधील सदस्यांनी कळसुबाई शिखरावर 321 फूट लांबीच्या तिरंग्यातून महाराष्ट्राचा नकाशा तयार करून शहीद जवानांना अनोखी आदरांजली वाहिली.
 
लोणंदच्या श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात उंच 1646 मीटर उंचीच्या कळसुबाई शिखर मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.  यानुसार श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुपचे साठ सदस्य कळसुबाई शिखरावर दाखल झाले. देशासाठी शहीद झालेल्या जवानांना अनोख्या मार्गांने आदरांजली वाहिल्याबद्दल भैरवनाथ ग्रुपचं कौतुक करण्यात येत आहे.
 
कळसुबाई शिखरावर जाऊन तिरंगा झेंड्याद्वारे महाराष्ट्राचा नकाशा करण्याची संकल्पना एव्हरेस्टवीर प्राजीत परदेशी यांनी मांडली होती. श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपचे संस्थापक शशिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा उपक्रम राबविण्यात आलाय.