भाग्योदय विद्यालयात नवगतांचे स्वागत व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

विद्यार्थ्यांच्या यशात पालक व शिक्षकांचा मोठा वाटा - प्रल्हाद साठे

नगर – विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भाग्योदय विद्यालयाच्यावतीनेराबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद असेच आहे. या उपक्रमांचा फायदा विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण गुणांना प्रोत्साहन देत यशाचे शिखर पदाक्रांत करत आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशात पालक व शिक्षकांचा मोठा वाटा असतो. विद्यार्थ्यांनीही जीवनात कधीही पालक-शिक्षकांना विसरु नका. त्यांचे मार्गदर्शन हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला उपयोगी पडणार आहे. विद्यालयात शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याने या योजनांचा फायदा विद्यार्थ्यांनी घेऊन आपली प्रगती साधावी. मोफत पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्याचा उपयोग करुन जीवनात यशस्वी व्हावे, असे प्रतिपादन रेसिडेन्शीअल विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य प्रल्हाद साठे यांनी केले. केडगांव येथील भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी नवगत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, मोफत पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यालयातील इ.10 व इ. 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रेसिडेन्शीअल विद्यालयाचे निवृत्त
प्राचार्य प्रल्हाद साठे, संस्थेच्या संचालिका सौ.वैशालीताई कोतकर, सचिव रघुनाथ लोंढे, इंजि.प्रसाद आंधळे, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, रेणुकामाता प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्सी नरवडे, पालक प्रतिनिधी सौ.माने, सौ.कांडेकर आदि उपस्थित होते. याप्रसंगी वैशालीताई कोतकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी संस्थेच्यावतीने सर्वोतोपरि सुविधा पुरविण्यात येत आहेत. नियमित शिक्षणाबरोबर विविध स्पर्धा, परिक्षांसाठीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जात असल्याने विद्यालयाच्या गुणवत्तेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात शिक्षकांचे मोठेयोगदान आहे. 10वी व 12 वी तील यशस्वी विद्यार्थी हे संस्थेचा अभिमान आहे. भविष्यातील त्यांचे यश इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी राहिल, असे सांगितले. प्राचार्य ज्ञानदेव बेरड म्हणाले, शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या पाठिवरील ओझे कमी करण्यासाठी एकाच पुस्तकात सर्व विषय दिल्याने विद्यार्थ्यांसाठी हीप्रक्रिया सुलभ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वार्षिक नियोजनाप्रमाणे अभ्यास करण्यास सोपे होणार आहे. मोफत पाठ्यपुस्तकांबरोबर इतरही शालेय साहित्याचे वाटप करण्यात येत असल्याने त्यांच्या गरजा पूर्ण केल्या जात आहे. विद्यार्थीही चांगला अभ्यास करत इतर क्षेत्रातही चमकत असल्याने विद्यालयाच्या लौकिकातभर पडत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय पांडूळे यांनी केले तर आभार संतोष काकडे यांनी मानले. यावेळी नवगत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, फुगे, खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोपट येवले, साहेबराव कार्ले, सोपान तोडमल, बाबासाहेब कोतकर, आदिनाथ ठुबे, रुपाली शिंदे, गोविंद कदम, गोरक्ष कांडेकर, एकनाथ होले, गणेश गायकवाड, बाळासाहेब कावरे, सुधाकर गायकवाडआदिंसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.