आरोग्यसेवेच्या रोपाचे वटवृक्ष आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुपाने बहरले – शरद पल्लोड

राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषी म.सा. यांच्या 30 व्या स्मृतीदिनाचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)-

 

 

आरोग्यसेवेच्या रोपाचे वटवृक्ष आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या रुपाने बहरले आहे. या आरोग्यसेवेची सावली सर्वसामान्यांना मिळत आहे. सेवाभावाने सुरु असलेल्या आरोग्य सेवेची कीर्ती देशभर पसरली असून, जैन सोशल फेडरेशनचे सदस्य रुग्णसेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेत असल्याचे प्रतिपादन शरद पल्लोड यांनी केले. तर भारताचा सर्वात मोठा शत्रू मधुमेह असून, जगातील सर्वाधिक रुग्ण आपल्या देशात आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी समाजात जागृती हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे स्पष्ट केले.

 

 

राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या 30 व्या स्मृतीदिनानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्व. शकुंतलाबाई सुवालालजी बोथरा यांच्या स्मरणार्थ सुवालालजी बोथरा परिवाराच्या सहकार्याने आयोजित मोफत मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी व चिकित्सा शिबीराचे उद्घाटन झाले. यावेळी पल्लोड बोलत होते. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ठाकूर, सुवालालजी बोथरा, विनोद बोथरा, प्रमोद बोथरा, प्रकाश बोथरा, चंचलबाई चोरडीया, कमलाबाई लुंकड, सुबोध बोथरा, कविता बोथरा, कल्पना बोथरा, वैशाली बोथरा, संगीता बोथरा, विमलाबाई समदडिया, आशुतोष बोथरा, मोहक बोथरा, श्रेयश बोथरा, ऋषभ बोथरा, रविजा बोथरा, सेजल बोथरा, महिमा बोथरा, गणेश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, सतीश लोढा, डॉ. प्रविण डुंगरवाल, डॉ. गजेंद्र गिरी, डॉ. रविराज गवळी, डॉ. जयप्रकाश शिरपुरवार आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

पुढे पल्लोड म्हणाले की, आनंदऋषीजी या अद्यावत हॉस्पिटलची उभारणी करून रक्तपेढी, नेत्रालय व बाल विभागाची उभारणी करुन एका छताखाली गरजूंना आरोग्यसेवा दिली जात आहे. कोरोनाच्या काळात सर्वांना वैद्यकीय सेवेचे महत्त्व कळाले आहे. मंदिरापेक्षा अद्यावत आरोग्य मंदिर निर्माणाचे कार्य काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी आरोग्य सेवेचे व्रत गरजूंसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून अविरत सुरू आहे. शेवटच्या घटका पर्यंत आरोग्यसेवा पुरविण्याचे काम सुरु आहे. या सामाजिक कार्यासाठी बोथरा परिवाराचे नेहमीच सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत सतीश लोढा यांनी केले. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता ठाकूर यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उत्तमपणे गरजूंची रुग्णसेवा सुरु आहे. महागाईच्या काळात सर्वसामान्यांना जीवन जगणे अवघड असताना अत्याल्प दरात अनेक रुग्ण जगविण्याचे कौतुकास्पद कार्य हॉस्पिटलच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

डॉ. वसंत कटारिया म्हणाले की, मधुमेह झाल्याचे सहजासहजी कळत नाही. मधुमेहाचे लवकर निदान करुन उपचार घेतल्यास निरोगी जीवन जगता येते. हा सायलेंट किलर असून, मधुमेह असलेल्यांना इतर आजार उद्भवल्यास अनेक धोके निर्माण होतात. कोरोना काळात मधुमेह असलेले अनेक रुग्ण दगावले. धावपळीचे जीवन, चुकीची आहार पध्दती व व्यायामाच्या अभाव मधुमेह होण्याची मुख्य कारणे ठरत असल्याचे त्यांनी सांगून, मधुमेहाचे धोके व त्यापासून वाचण्याचे उपाय त्यांनी यावेळी सांगितले.

 

सबस्क्राइब करा 

 

 

कमलबाई लुंकड म्हणाल्या की, सेवा हा धर्म असून, सेवाधर्माने आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य सुरू आहे. व्याधी असलेल्यांना बरे करुन त्यांच्या जीवनात शांती व संतुष्ट निर्माण केले जात आहे. प.पू. आनंदऋषीजी यांच्या आशीर्वादाने रुग्ण बरे होऊन घरी परत जात असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबीरात 271 रुग्णांची मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली. शिबीरार्थींना पुढील उपचार अल्पदरात उपलब्ध करुन देण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी जैन सोशल फेडरेशन सदस्य व हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.