साई मिडास वर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

परवानगी न घेतल्याने काम तात्काळ थांबवण्याचे आदेश

अहमदनगर – शहरातील झोपडी कॅन्टीन परिसरात दूध संघाच्या जागेवर उभी असलेली साईमिडास ही टोलेजंग इमारत आणखी एका अडचणीच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वादग्रस्त इमारतीच्या बिल्डिंगचे बांधकाम तात्काळ बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. त्याची परवानगी न घेतल्याने हे काम तात्काळ थांबवा. ही मोठी कारवाई मंडळांने केल्याने नगरमध्ये लँड माफिया आणि बांधकाम व्यवसायिकांच्या चर्चेत आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते आहे. याबाबत काँग्रेस नेते दीप चव्हाण व शहर सहकारी बँकेचे विश्वस्त संजय घुले यांनी जेष्ठ विधीज्ञ अभिजीत पूप्पाल यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. दोन लाख स्क्वेअर फुटापेक्षा जास्त बांधकाम असेल तर हरित आयोग व प्रदूषण नियंत्रण मंडळाची रितसर परवानगी घ्यावी लागते. परवानगी घेतली गेली नसल्याची तक्रार संजय घुले व अभिजीत पूप्पाल यांनी केली होती. त्याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या प्रकल्पाला भेट देण्यासाठी आले असता, त्यांना या प्रकल्पात त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाने मनपा आयुक्तांना साईमिडास ऑरम बिजनेस हब अँड ओआरओ रेसिडेन्स या इमारतीवर तात्काळ कारवाई करा. याचे सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबवा. याबाबत प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, नाशिक यांनी 22 जुलै 2024 रोजीच्या पत्रानुसार साई मिडास प्लॉट नंबर (44 अधिक 44/1)/1 व (44 अधिक 44/1)/2, फायनल प्लॉट नंबर 44 44/1 या प्लॉटवर सुरू असलेल्या बांधकामाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून अनुमती पत्र आणि पर्यावरण विभागाचे संमती पत्र घेतले नसल्याने सदर इमारतीचे बांधकाम थांबवण्याचे निर्देश दिलेले आहेत. असे त्यांनी आदेशात म्हटले आहे. दोन लाख स्क्वेअर फुटापेक्षा जास्त जर बांधकाम औद्योगिक, व्यावसायिक किंवा घरगुती प्रकारात जर करायचे असेल तर या स्क्वेअर फुटात राहण्यास जाणाऱ्या लोकांकडून ते वापरत असलेले पाणी हवा अन्न यातून जो मैला तयार होईल. सांडपाणी गटारीत जाईल हवा प्रदूषित होईल त्यानुसार त्या बांधकाम व्यावसायिकाने सदर इमारतीत विशिष्ट तरतुदी करून मैला, कचरा विल्हेवाट लावण्याआधी वर प्रक्रिया प्रकल्प उभारणे आवश्यक असते. परंतु याठिकाणी अधिकाऱ्यांना तसे काहीच दिसले नाही. ही इमारत जर पूर्ण क्षमतेने सुरू झाली तर त्याचा नगरच्या प्रदूषणावर घातक असा परिणाम होण्याची शक्यता होती. याआधी साईमिडास ही इमारत महानगरपालिकेकडून मिळालेल्या बांधकाम परवानगीत फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अडकलेली आहे. आता हरित लवादाकडून परवानगी न घेतल्यामुळे हा प्रकल्प नगरकरांच्या जीवावर उठतो की काय? असा सवाल विचारला जात आहे.

.