अर्बन बँकेच्या ठेवीदाराना ६३ कोटी परत मिळणार!
अहमदनगर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर अवसायनात निघालेल्या नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या पात्र १७,४२४ ठेवीदारांना ६३ कोटी रुपये परत करण्याच्या तिसऱ्या टप्यातील प्रस्तावास डीआयसीजीसी ने मान्यता दिली असून, ही रक्कम लवकरच केवायसी कागदपत्रांची पूर्तता व क्लेम फॉर्म भरून दिलेल्या पात्र ठेवीदारांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अवसायक तथा एनसीडीसीचे संचालक गायकवाड यांनी दिली. गणेश दहा महिन्यांपूर्वी बँकेच्या अवसायक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गायकवाड यांनी बँकेच्या दैनंदिन खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने भाडेतत्त्वावर कार्यालय असलेल्या १८ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ठेवीदारांचे पैसे परत करण्याच्या दृष्टीने डीआयसीजीसीकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आतापर्यंत ५ लाखांच्या आतील पात्र ठेवीदारांचे मार्च २०२२ मध्ये पहील्या क्लेमचे रु.१८१.७१ कोटी, जून २०२२ मध्ये दुसऱ्या क्लेमचे रु. ११३.१४ कोटी असे एकूण रु. २९४.८५ कोटी ठेवी परत केल्या आहेत. त्याचबरोबर वसुलीसाठी थकीत कर्ज एकरकमी कर्ज परतफेड योजना सुरू केली. गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये थकीत कर्जापैकी ४०.३२ कोटी रुपयांची वसूली करण्यात आली आहे. उर्वरित थकीत कर्ज वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असून त्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे पोलिस प्रशासन व न्यायालयात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.