राजू शेट्टींची मोदींवर खोचक टीका

मोदींनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये

कोल्हापूर :

मागील अनेक दिवसांपासून  दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.  केंद्र सरकारला बळाचा वापर करून शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढायचं आहे.  पण सरकारने शेतकऱ्याच्या रक्ताने स्वत:चे हात रंगवून घेऊ नये, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये, असं राजू शेट्टी यांनी बजावलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी ही टीका केली. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या चारही बाजूंना वेढा घातला आहे.  लाखो शेतकरी हजारो वाहने घेऊन दिल्लीत आले आहेत.  त्यांची दिल्लीतून परत जाण्याची मानसिकता नाही.  हे आंदोलन कोणत्याही एका पक्षाच्या किंवा संघटनेच्या हातात राहिलेलं नाही.  शेतकऱ्यांचा हा रोष कमी करायचा असेल तर कृषी कायदे मागे घेतले पाहिजे, असं शेट्टी म्हणालेत.