अपघातातील जखमींना कॅशलेस उपचार उपलब्ध

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

नवी दिल्ली : रस्त्यावरील वाहन अपघातात जखमी झालेल्या लोकांना कॅशलेस वैद्यकीय उपचार मिळण्याची योजना केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर चंदिगड, आसाममध्ये राबवण्याला प्रारंभ केला आहे. अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गुरुवारी लोकसभेत या संदर्भात बोलताना ते म्हणाले, मोटार वाहनांचा अपघात कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर झालेला असो त्यातील रुग्णांना कॅशलेस वैद्यकीय उपचार मिळतील असे या योजनेचे स्वरूप असून आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये ही योजना लागू आहे. त्यात अपघात झाल्यानंतरच्या सात दिवसांपर्यंत कमाल दीड लाखापर्यंत मोफत उपचार मिळण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. उपचार मिळण्याच्या या योजनेमुळे रस्त्यावर होणाऱ्या दुर्घटनेत मरण पावणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते. तसेच जखमींना अधिक उत्तम उपचार लवकरात लवकर मिळू शकतात. त्यामुळे ही योजना सुरू केल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.