1991 ची पुनरावृत्ती, निलेश लंकेच्या निवडीला सुजय विखे यांच्याकडून आव्हान
औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल
अहमदनगर : 1991 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब विखे हे अहमदनगर मतदारसंघातून पराभूत झाले होते. त्यावेळी यशवंतराव गडाख विजयी झाले होते. या निवडणुकीनंतर विखे यांनी गडाख यांचे निवडीला आव्हान दिले होते. गडाख, शरद पवार यांनी भाषणांमधून आपली बदनामी केली. त्यामुळे आपल्या मतांवर विपरीत परिणाम झाला.असा दावा विखे यांनी केला होता. या याचिकेनंतर गडाखांची निवड रद्द झाली होती. विखे-गडाख खटला म्हणून तो खटला खूप गाजला होता. सुजय विखे यांनीही याच धरतीवर याचिका दखल दाखल केलेली आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी, महायुतीचे पराभूत उमेदवार सुजय विखे पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. निलेश लंके यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा. अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. माजी खासदार सुजय विखे यांनी अश्विन होन यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेतून काही मतदान केंद्रावरील मोजणीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. संबंधित 40 ते 45 केंद्रावरील मतमोजणी योग्य पद्धतीने झालेली नाही. याची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रीतसर शुल्क भरून फेर पडताळणीची मागणी केलेली आहे. याशिवाय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निलेश लंके व त्यांच्या प्रचारक यांनी केलेली भाषणे विखे पाटलांची खोटी बदनामी करणारी आहेत. तसेच निलेश लंकेनी दाखवलेला निवडणूक खर्च आणि प्रत्यक्ष खर्च यांचा ताळमेळ दिसून येत नाही. मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च त्यांनी दाखवलेला नाही. परिणामी लंके यांनी दाखवलेल्या निवडणुकीतील खर्चातील मर्यादेचे उल्लंघन मुद्द्यांवर सुजय विखे पाटील यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. खंडपीठाने ही याचिका दाखल करून घेतलेली आहे.