पाणीपट्टी वाढवण्याचा मनपाचा निर्णय कायम

मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न करू : मनपा आयुक्त यशवंत डांगे

महापालिकेने दुपटीने वाढवलेल्या पाणीपट्टीला विरोध सुरू असूनही पाणीपट्टी वाढिवर महापालिका प्रशासन ठाम आहे. मात्र नागरिकांच्या मागणीचा विचार करत, पाणीपट्टीच्या दराबाबत मध्यमार्ग काढण्यात येईल. मात्र, पाणीपट्टी वाढवावीच लागेल, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाणीपट्टी ३ हजार रुपयांऐवजी २२०० ते २४०० रुपये निश्चित करण्याचा विचार प्रशासकीय स्तरावर सुरू आहे.असेही त्यांनी नमूद केले  आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिकेने तब्बल २१ वर्षांनंतर पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. स्थायी समितीच्या बैठकीत १५०० रुपयांची पाणीपट्टी ३००० रुपये म्हणजे दुप्पट करण्याची शिफारस करण्यात आली. या संभाव्य कर वाढीला आता विरोध सुरू झाला आहे. प्रशासक डांगे यांनी प्रशासन पाणीपट्टी वाढवण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. पाणी योजना व वितरण व्यवस्थेचा वर्षाचा खर्च ४४ कोटी आहे. त्या तुलनेत पाणीपट्टीची मागणी केवळ १० कोटींच्या आसपास आहे.महापालिका ही नफा कमवणार संस्था नक्कीच नाही. मात्र, ही तूट मोठी असल्याने काही प्रमाणात का होईना पाणीपट्टी वाढवावीच लागणार आहे. दराबाबत मध्य मार्ग काढून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त डांगे यांनी सांगितले.दरम्यान, पाणीपट्टीबाबत प्रशासकीय स्तरावरही खल सुरू आहे. पाणीपट्टी ३ हजार ऐवजी २२०० ते २४०० रुपये निश्चित करण्याबाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. असे सांगण्यात आले