छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महेंद्र गायकवाडने पटकाविली सोन्याची गदा

अहमदनगर:मेट्रो न्यूज 

अहमदनगर येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये अंतिम सामना महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये झाला. कुस्ती खेळताना शिवराज राक्षे याच्या पायाला दुखापत झाल्याने महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आले.

रविवारी सकाळी विविध वजन गटातील अंतिम कुस्त्या पार पडल्या. फक्त ओपन गटातील उपांत्य फेरी व अंतिम फेरीच्य दिग्गज मल्लांच्या कुस्त्या पार पडल्या. वाडियापार्क क्रीडा संकुल प्रेक्षकांनी कुस्ती पाहण्यासाठी गच्च भरले होते. बोल बजरंग बली की जय! चा गजर करीत कुस्तीप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. उपविजयी मल्ल शिवराज राक्षे याला 2 लाख व तृतीय विजेते ठरलेले गादी व माती विभागातील सिकंदर शेख, माऊली कोकाटे (पुणे) यांना प्रत्येकी 50 हजार देण्यात आले. विविध वजन गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या मल्लांना अनुक्रमे 1 लाख, पन्नास हजार व तीस हजार रुपये तसेच 79, 86 किलो वजन गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या मल्लांना 1 लाख 25 हजार, 75 हजार व 50 हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले. तर सुभाष लोंढे व संभाजी लोंढे यांच्या वतीने विजेत्यांना आकर्षक स्व.पै. छबुराव लांडगे यांच्या मुर्तीचे चषक देण्यात आले.

यावेळी पालकमंत्री तथा महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आ. प्रा. राम शिंदे, आ. बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी सिध्दराम साळीमठ, हिंद केसरी योगेश दोडके, अर्जुनवीर पुरस्कार प्राप्त काका पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अस्थायी समिती अध्यक्ष संजय सिंग, स्पर्धेचे संयोजक सुवेंद्र गांधी, अनिल शिंदे, जिल्हा तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष पै. वैभव लांडगे, वसंत लोढा, अभय आगरकर, महेंद्र गंधे, दिलीप सातपुते, भानुदास बेरड, सचिन जाधव, सचिन पारखी, सुभाष लोंढे, प्रशांत मुथा, सचिन पारखी, बाबुशेठ टायरवाले, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, अ‍ॅड. धनंजय जाधव, आकाश कातोरे, मदन आढाव, विक्रम राठोड, पै. नाना डोंगरे, संग्राम शेळके, प्रताप चिंधे, मोहन हिरनवाळे, महेश लोंढे, बाळासाहेब भुजबळ, नितीन शेलार, आकाश कातोरे, मदन आढाव, ओंकार सातपुते, पै. अनिल गुंजाळ, पै. सुभाष लोंढे, अजय आजबे, मेघराज कटके, संभाजी निकाळजे, हंगेश्‍वर धायगुडे, ओंकार शिंदे आदींसह भाजप, शिवसेना व जिल्हा तालिम संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुस्ती खेळाला सर्वात प्रथम छत्रपती शिवरायांनी प्रोत्साहन दिले. यानंतर शाहू महाराजांनी त्यांच्या काळात तालीम बांधल्या व या खेळाला चालना दिली. हाच वारसा या स्पर्धेतून पुढे नेण्यात आला आहे. शाहू महाराजांनी विजेत्या मल्लांना चांदीची गदा देण्याची परंपरा निर्माण केली व आता कुस्ती मल्लांना सोन्याची गदा देण्याची नवीन परंपरा सुरू झाली असल्याचे सांगितले.