45 शाळांचे 11 समूह शाळेत विलीनीकरण

नगर; जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या कमी होत असल्याने जिल्ह्यातील 45 शाळांचे 11 समूह शाळेत विलीनीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी. हा या उपक्रमातील उद्देश आहे अशी माहिती शिक्षण विभागाने दिली. जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाने उपसंचालक कार्यालयाला समूहशाळेबाबत प्रस्ताव पाठवला होता. शिक्षण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी दुर्गम तसेच अतिदुर्गम भागातील वाडी वस्तीवर जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. गाव तेथे शाळा उपक्रमांतर्गत शाळांची संख्या साडेतीन हजारांवर पोहोचलेली आहे. परंतु शाळांमधील पटसंख्या सातत्याने घसरत असल्याने शाळांसमोर पटसंख्या वाढीचे आव्हान आहे. अनेक शाळांमध्ये पाच ते दहा मुलांसाठी दोन शिक्षक कार्यरत आहेत. शाळा बंद न करता तसेच शिक्षकांची पदे कमी न करता समूह शाळेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे. तसेच सांघिक भावना निर्माण व्हावी या हेतूने समूह शाळा करण्यात येणार आहेत. पारनेर तालुक्यातील जामगाव कर्जुले, हरिया, खडकवाडी, पारनेर, पिंपळगाव, रोठा, राळेगणसिद्धी, हंगा, वडझिरे तसेच राहता तालुक्यातील राहता, कोल्हार, लोणी अशा एकूण 11 मोठ्या शाळांची समूह शाळेसाठी निवड केली आहे.