कसबा पोटनिवडणुक विजयाचा शहर काँग्रेसने गुलाल उधळत साजरा केला आनंदोत्सव .

अशाच विजयाची पुनरावृत्ती आगामी काळात नगर शहरात ही दाखवू - किरण काळे

अत्यंत चुरशीच्या झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी कडून लढलेल्या काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चितळे रोडवरील शिवनेरी कार्यालयासमोर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत या विजयाचा                                                                                     आनंदोत्सव साजरा केला आहे. अशाच विजयाची पुनरावृत्ती आगामी काळात                                                                                       नगर शहरात देखील जनतेच्या आशीर्वादाने काँग्रेस करून दाखवेल असा                                                                                           विश्वास या विजयानंतर बोलताना काळे यांनी व्यक्त केला आहे.

कसब्याची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत भाजपवर अनेक आरोप, प्रत्यारोप झाले. भाजपचे अनेक मंत्री कसबा मतदारसंघात मागील आठ दिवसांपासून तळ ठोकून होते. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी प्रचाराचे मैदान तापवले होते. मात्र मतदारांनी काँग्रेस उमेदवाराला आपल्या पसंतीचा कौल दिला असून यामुळे काँग्रेससाठी हा उत्साह वाढवणारा विजय ठरत आहे. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला होता. धंगेकरांच्या विजयामुळे त्याला खिंडार पडले आहे.

काळे म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये काँग्रेसची लाट निर्माण होते आहे. कसब्यातील काँग्रेसचा विजय हा या देशातील बेरोजगारी, महागाई, इंधन दरवाढ, जातीयवाद या विरोधातील विजय आहे. या निवडणुकीत प्रचंड पैशांचा पाऊस पाडला गेला. मतदार नको म्हणत असताना देखील बळजबरीने लोकांच्या घरात भाजपने पैसे, निवडणुकीच्या स्लिपा टाकल्या. दहशत केली गेली. मात्र मतदारांनी पैसे आणि दहशतीला झुगारून लावलं. आगामी काळात नगर शहरातील मतदार देखील अशाच पद्धतीने काँग्रेसला कौल देत विकासात्मक काम करायची संधी देतील असा विश्वास काळे यांनी यावेळी व्यक्त केला. शहर जिल्हा काँग्रेसने या काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात, विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचे अभिनंदन केले आहे.