शहरात मुस्लिम मावळ्यांनी केले शिवजयंती मिरवणुकीचे स्वागत
मिरवणुकीतील विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे कापड बाजार येथे मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. तर मुस्लिम समाज, मोची गल्ली व्यापारी असोसिएशन व हाजी अजीजभाई चष्मावाला प्रतिष्ठानच्या वतीने मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांना पाणी व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

मन्सूर शेख म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी जात, पंथ, धर्म असा भेदभाव कधी मानला नाही. अठरापगड जातीला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. यामध्ये मुस्लिम मावळ्यांचा देखील वाटा होता. त्यांनी अनेक महत्त्वाची पदे मुस्लिम सरदारांकडे मोठ्या विश्वासाने सोपवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात केल्यास समाजा-समाजात कधी दुरावा व तेढ निर्माण होणार नसून, प्रत्येकाने शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन त्यांचा विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.